
Solapur News : नैसर्गिक आपत्ती आणि पीकविमा भरपाईत महत्त्वाच्या असणाऱ्या ई-पीक नोंदणीची गती जिल्ह्यात तुलनेने कमीच आहे. सर्व्हरच्या वारंवार संथगतीमुळे ई-पीक पाहणीच्या अॅपला पुरेशाप्रमाणात त्याची जोड मिळत नसल्याने पीक नोंदणीत अडथळे येत आहेत. सर्व्हर चालत नाही. शेतकरी वारंवार प्रयत्न करून कंटाळून गेले आहेत. जिल्ह्यातील हजारो शेतकरी अद्यापही पीक नोंदणीपासून वंचित असून, ‘सर्व्हर’सोबतच ही नोंदणी स्थिती जिल्ह्यात ‘डाउन’ असल्याची स्थिती आहे.
सोलापूर जिल्हा खरिपाचा म्हणूनही ओळखला जाऊ लागला आहे. सुमारे तीन लाख हेक्टरवर या हंगामात आता पिके होत आहेत. या परिस्थितीत नैसर्गिक आपत्ती आणि पीकविम्यासाठी ई-पीक नोंदणी महत्त्वाची आहे. गेल्या महिन्यात या नोंदणीला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.
शिवाय संबंधित अॅपही व्यवस्थित चालले. त्यामुळे पीक नोंदीने गती घेतली. पण गेल्या पंधरवड्यापासून अनेक भागांत ‘सर्व्हर डाउन’चा अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी, शेतात जाऊन संबंधित अॅपवर नोंदणी करताना ऐनवेळी पुन्हा ही समस्या निर्माण होत असल्याने शेतकरी अक्षरशः वैतागले आहेत.
महसूल विभाग सुस्त
‘सर्व्हर’चा पुरेसा जोड या अॅपला मिळत नाही. पीक नोंदणीचे हे काम संपूर्णपणे महसूल विभागाच्या नियंत्रणाखाली आहे. या कामाविषयी तलाठी किंवा मंडलाधिकाऱ्यांकडे शेतकरी तक्रार करतात. तेव्हा पुन्हा- पुन्हा प्रयत्न करा, होईल. एवढेच उत्तर मिळते. पण प्रत्यक्षात कर्मचारी शेतकऱ्यांना त्यासाठी मदत करत नाहीत, असे चित्र आहे.
३० ते ४० टक्के शेतकरी प्रतीक्षेत
जिल्ह्यात ई-पीक नोंदणीसाठी सुमारे १ लाख ७७ हजार ४७१ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी १ लाख १८ हजार ९११ शेतकऱ्यांनी ही ई-पीक नोंदणी पूर्ण केलेली आहे. अद्यापही किमान ३० ते ४० टक्के शेतकरी या नोंदणीपासून दूर आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.