Ahmednagar news : उशिराने आलेल्या पावसामुळे खरिपातील कडधान्याच्या क्षेत्रात यंदाही घट झाली आहे. गतवर्षीपेक्षा यंदा २ लाख ८४ हजार हेक्टरने कमी पेरले आहे. त्यात तुरीचे क्षेत्र ५५ हजारांनी, मुगाचे क्षेत्र एक लाख ५ हजार, उडदाचे क्षेत्र १ लाख ७ हजार आणि इतर कडधान्यांचे क्षेत्र २० हजार हेक्टरने कमी आहे. गेल्या चार वर्षांचा विचार केल्यास कडधान्याचे क्षेत्र कमीच होत चालले आहे.
राज्यात खरिपाचे १ कोटी ४२ लाख २ हजार ३१८ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. खरिपात बाजरी, सोयाबीन, कापसासह तुरीचे क्षेत्र अधिक असते. मूग, उडदाचीही काही जिल्ह्यांत बऱ्यापैकी पेरणी होते. खरीप तुरीचे १३ लाख हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. मुगाचे ३ लाख ९४ हजार, उडदाचे ३ लाख ७० हजार हेक्टर क्षेत्र आहे. याशिवाय चवळी, कुळीथ, मटकी, राजमा व अन्य कडधान्यांचे ७९ हजार हेक्टर सरासरी क्षेत्र आहे.
यंदा राज्यातील बहुतांश भागात साधारण दहा ते पंधरा दिवसांनी उशिरा पाऊस झाला. शिवाय आधीही वळीवाचा पाऊस झाला नाही. त्याचा परिणाम शेती मशागतीवर झाला. त्यामुळे पेरण्यांना उशिरा झाला. त्याचा फटका प्रामुख्याने उडीद, मुगाच्या क्षेत्राला बसला. मुगाची गेल्या वर्षी २ लाख ७७ हजार २९० हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा ती १ लाख ७३ हजार ७२५ हेक्टरवर झाली आहे. उडदाची गतवर्षी ३ लाख ५३ हजार ५०९ हेक्टरवर, तर यंदा २ लाख ४६ हजार ७२२ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
यंदा नगर, जालना, नाशिक, जळगाव, नांदेड जिल्ह्यांशिवाय अन्य भागांत मुगाचे क्षेत्र अल्प आहे. उडदाचे नगर, सोलापुरला सर्वाधिक क्षेत्र असते. नगर, सोलापूरसह यंदा जळगाव, बीड, धाराशिव, नांदेड जिल्हे वगळले, तर राज्यातील अन्य जिल्ह्यांत उडीद अल्प आहे. तुरीची यंदा कमीच पेरणी झाली आहे. चवळी, कुळीथ, मटकी, राजमा व अन्य कडधान्यांची गतवर्षी ७७ हजार ४१० हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा ती ५८ हजार २११ हेक्टरवर झाली आहे. एकूण कडधान्यांची यंदा १५ लाख ७८ हजार ५७८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गतवर्षी एकूण कडधान्याच्या पेरणीचा आकडा १८ लाख ६५ हजार हेक्टरवर होता.
यंदा कडधान्याचे क्षेत्र घटले आहे. केवळ अमरावती, यवतमाळमध्ये एक लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कडधान्याची पेरणी झाली आहे. अनेक भागांत अल्प पावसावर पेरणी झाली खरी, मात्र त्यानंतर पाऊस नाही. आता आठ दिवसांपासून खंड पडला आहे. त्यामुळे पिके धोक्यात आहेत. अनेक भागांत पावसाअभावी
तुरीच्या पिकाने भुई सोडली नाही. मूग, उडदाला येणाऱ्या शेंगावर परिणाम झाला आहे. त्यामुळे कडधान्याचे उत्पादन यंदा घटणार आहे.
२०१९-२०...२१ लाख ३४ हजार
२०२०-२१...२२ लाख २० हजार
२०२१-२२...२२ लाख ९१ हजार
२०२२-२३...१८ लाख ८४ हजार
२०२३-२४...१५ लाख ७८ हजार
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.