
Nashik Weather News : वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीने (Hailstorm) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर ग्रासलेले आहे. असे असतानाच रविवारी (ता. १६) पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी पाऊस व गारपिटीमुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.
वाचलेला थोडाफार शेतीमाल विकता येईल, अशी अपेक्षा होती. मात्र आता धूसर झाली आहे. पावसाचा कहर कायम असून सोबत हलकीशी गारपीट झाल्याने पुन्हा एकदा दिंडोरी तालुक्यातील पूर्व तर सिन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांना तडाखा बसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.
जिल्ह्यात कमाल तापमानात वाढ दिसून येत असून ३९ अंशांवर तापमान आहे. उन्हाचा चटका वाढत असून दुपारी ४ च्या सुमारास पावसाने दणका दिल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. जिल्ह्यात अनेक भागांत उन्हाळ कांदा काढणी सुरू आहे.
मात्र रविवारी (ता. १६) दुपारी दिंडोरी, सिन्नरसह मालेगाव परिसरात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी उपटून ठेवलेला कांदा अचानक आलेल्या पावसामुळे भिजला. तर दिंडोरी तालुक्यांतील मोहाडी परिसरात शेतात पाणी साचून कांदा पाण्याखाली गेल्याचे दिसून आले.
दिंडोरीतील मोहाडी परिसरात सव्वा पाचच्या सुमारास गावाच्या उत्तरेला २५ मिमी पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर अधिक असल्याने या भागातील द्राक्ष बागा व कांद्याच्या शेतांमधून पाणी शिवारातून वाहिले. तर जोपुळ, खडक सुकेणे, चिंचखेड परिसरात पावसाने पुन्हा दणका दिल्याने द्राक्ष उत्पादक हतबल झाले आहेत.
सिन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात सायंकाळी साडे पाचच्या सुमारास पश्चिम पट्ट्यातील शिवडे, घोरवड, बोरखिंड व पांढुर्ली परिसरात गारपीट झाली.
तर विंचुरी दळवी परिसरात पाऊस होता. पावसाने हाती आलेल्या पिकांचा घास पुन्हा हिरावून नेला. गारपिटीने द्राक्षबागांना मोठा फटका बसला असून, उन्हाळ कांदा, गहू,कांदा बियाणे (डोंगळे), हरभरा व भाजीपाला पिकांना मोठा फटका आहे.
सटाणा तालुक्यातील वायगाव तर मालेगाव तालुक्यातील सातमाने, शेरुळ तर नांदगाव तालुक्याचा पूर्व भागात तुरळक हलक्या सरी झाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांची येथे धावपळ दिसून आली. येवला तालुक्यात हलक्या सरी बरसल्या.
भाजीपाला रोपवाटिकांचे नुकसान
सिन्नर तालुक्यातील घोरवड परिसरात काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी भाजीपाला रोपवाटिका व्यवसाय सुरू केला आहे.
मात्र गारपिटीसह वादळी वाऱ्याच्या तडाख्यात भाजीपाला रोपवाटिकांवरील कागद उडून गेले आहेत. तर गारा छतावर पडल्याने सांगाडे वाकून आडवे झाले आहेत.
भाजीपाला रोपंसह टॉमॅटो लागवडी मोठ्या प्रमाणावर बाधित झाल्या आहेत. तर पांढुर्ली शिवारातील महामार्गावर दोन ठिकाणी झाडे पडल्याने काही वेळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
वीज पडल्याने जनावरे मृत्यूमुखी
सिन्नर तालुक्यात नांदूर शिंगोटे येथे वीज पडल्यामुळे १६ शेळ्या व बैल मृत्युमुखी पडला. तर निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरेत येथे घरासमोर वीज पडल्याने दोन गायींचा जागीच मृत्यू तर, अन्य दोन गाई व एक म्हैस जखमी झाली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.