Jalgaon News खानदेशात या महिन्यात वादळी पाऊस व पीकहानी (Crop Damage) सुरूच आहे. गुरुवारी (ता. २०) सायंकाळी जळगाव, धुळे व नंदुरबारमधील अनेक गावांत वादळी पाऊस झाला. यात केळी, मका, ज्वारी, बाजरी आदी पिके आडवी झाली. तसेच फळपिकांचेही नुकसान झाले आहे.
खानदेशात मार्चमध्ये ५ ते ७ मार्च आणि त्यानंतर ९ ते १७ मार्च दरम्यान सर्वत्र वादळी पाऊस झाला. त्यातही कमी व अधिक नुकसान झाले. पंचनामे व इतर कार्यवाही झाली. त्यात विविध टप्प्यांत सुमारे ६० हजार हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले.
त्यात या महिन्यात ४ एप्रिलपासून विविध भागांत वादळी पाऊस, नुकसान सुरूच आहे. वादळी पावसात या महिन्यातही सुमारे २५ ते २७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. पिके भुईसपाट झाली आहेत. शेतमालाचे दर दबावात असतानाच मजूरटंचाई व इतर संकटे आहेत. सततच्या नुकसानीने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.
या आठवड्यात रोज वादळ व पाऊस आणि हलकी गारपीट, अशी स्थिती राहिली आहे. गुरुवारी (ता. २०) सायंकाळी जळगाव जिल्ह्यातील जामनेर, पाचोरा, बोदवड, पाचोरा, एरंडोल आदी भागांत वादळी पावसाने केळी, मका, बाजरी व इतर फळ पिकांचे नुकसान झाले.
जामनेरातील फत्तेपूर, टाकळी भागांत केळी भुईसपाट झाली. वृक्ष उन्मळून पडले. यात कोट्यवधींची हानी झाली आहे. प्रशासनाने गुरुवारी सायंकाळीच माहिती घेऊन कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत.
पंचनामे सुरू
धुळ्यातही धुळे, साक्री भागांत वादळ व पाऊस झाला. नंदुरबारमधील नवापूर, नंदुरबार, अक्कलकुवा भागांतही नुकसान झाले. वादळाने अधिक नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे दोन ते अडीच हजार हेक्टरला फटका बसल्याचा अंदाज आहे.
तर धुळे व नंदुरबारातही सुमारे एक ते दीड हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पंचनामे सुरू झाले आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.