
महाराष्ट्रात १९७२ च्या दरम्यान भीषण दुष्काळ (Drought) पडला होता. लोकांच्या शेतातली उभी पीक जळून (Crop Damage) गेली होती. अन्न पाण्यावाचून गोठ्यातली जनावर मरून गेली होती. कोणाच्याच घरात अन्नाचा कण नव्हता. भूकबळीची (Starvation) संख्या वाढतचं होती.
दुष्काळाचा फटका एवढा मोठा होता की मोठमोठे बागायतदार देखील या रोजगाराच्या कामावर येऊ लागले. धान्यांची सरकारी गोदाम रिकामी होती. अशात मदतीला धावून आली होती सुखडी. लहान मुलांना पोषण म्हणून बनवलेल्या या पदार्थाने उभा महाराष्ट्र जगवला होता.
त्यानंतर अशा पोषक आहाराच्या वड्या तयार करण्याचे प्रयत्न फारसे काही दिसून आले नाहीत. मात्र भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या तज्ञांनी असा एक प्रयोग केलाय. चिकनची वडी. ही वडी कुपोषणावर मात करणार असल्याचं म्हटलं जातंय.
तर भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्रीय पक्षी संशोधन संस्थेतील तज्ञांनी चिकनपासून प्रथिनयुक्त वडी तयार केली आहे. कुपोषणावर मात करण्यासाठी ही वडी उपयुक्त ठरणार असल्याचं या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. या वडीची शेल्फ लाईफ तीन ते सहा महिने असेल.
संशोधन संस्थेच्या कुक्कुटपालन व्यवस्थापन विभागातील शास्त्रज्ञ डॉ. जयदीप रोकडे या वडी विषयी सांगतात की, भारताच्या पूर्व भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली की बऱ्याचदा भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होतो.
अशा स्थितीत लोकांना पोषक आहार मिळणं लांबची गोष्ट. ही बाजू विचारात घेऊन लोकांना कमी खर्चात प्रथिनयुक्त आहार उपलब्ध होण्यासाठी हा संशोधन प्रकल्प सुरू करण्यात आला. या वडीत आणखीन काय काय आहे?
तर प्रथिनांची उपलब्धता वाढविण्यासाठी चिकनसोबत वडी मऊ करण्यासाठी पेठा, सोयाबीन, कडधान्यांची डाळ असे घटक योग्य प्रमाणात मिसळलेले आहेत. या वडीला चव येण्यासाठी गरम मसाल्यांचा वापर करण्यात आला आहे.
साधारण तापमानाला ही वादी तीन ते सहा महिने टिकते. ही वडी तयार करण्यासाठी कमी अंडी देणाऱ्या कोंबड्या तसेच अंडी न देणाऱ्या देशी तसेच लेअर कोंबडीच्या चिकनपासून प्रक्रिया उत्पादन विकसित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यातून कुक्कुटपालकांच्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
याविषयी डॉ.जयदीप रोकडे सांगतात, शेतकरी अंडी देणाऱ्या देशी आणि लेयर कोंबड्यांचे संगोपन करतात. मात्र अंडी देण्याची क्षमता कमी झाल्यानंतर किंवा पूर्णतः बंद झाल्यानंतर ही कोंबडी साधारणपणे ७० ते ८० रुपयांना बाजारात विकली जाते.
हेच जर या कोंबडीपासून वडी बनवायची ठरवली तर एक किलो कोंबडीच्या चिकनपासून सुमारे दीड किलो वडी बनवता येते. या वडीची बाजारात २५० रुपये किलो या दराने विक्री करता येईल.
चिकन वडी तयार करण्यासाठी पोल्ट्री उत्पादकांना ९० रुपयांपर्यंत खर्च येईल. सध्या भारत सरकारकडे या उत्पादनाच्या पेटंटसाठी अर्ज करण्यात आला आहे. पेटंट मंजूर झाल्यानंतरच हा फॉर्म्यूला व्यावसायिक उत्पादनासाठी उद्योजकांना दिला जाणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.