रत्नागिरी ः गेले दोन दिवस मतलई वारे वाहू लागले असले तरीही हवामान (Weather) विभागाने जिल्ह्यात दोन दिवस ढगाळ वातावरण (Cloudy Weather) आणि हलक्या पावसाची शक्यता (Light Rainfall) वर्तविल्यामुळे बागायतदार धास्तावले आहेत. याचा परिणाम आंब्यावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. यंदा दिवाळीत थंडीचे (Winter) आगमन झाले, पण त्यात सातत्य नव्हते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आलेली पालवी जून कधी होणार हा प्रश्न बागायतदारांपुढे आहे. अशातच वातावरणाची साथ मिळाली नाही तर हंगाम पंधरा दिवस पुढे जाईल.
नैॠत्य बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे १४ ते १५ या कालावधीत कोकणात आकाश ढगाळ राहून रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक हलक्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान ३३ ते ३४ आणि किमान तापमान २० ते २३ अंश सेल्सिअसपर्यंत राहील, असा अंदाज कोकण कृषी विद्यापीठाकडून वर्तविण्यात आला आहे.
याचा परिणाम हापूसच्या कलमांवर होणार आहे. ढगाळ वातावरणामुळे आंबा बागेत कोवळ्या पालवीवर मिज माशी तसेच शेंडे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. तशी परिस्थिती निर्माण झाल्यास बागायतदारांना कीटकनाशकांची फवारणी करावी, असा सल्ला कृषी विद्यापिठाने दिला आहे.
पालवी अवस्थेत असलेल्या आंब्यावर तुडतुडा दिसू शकतो. आंबा बागेत जुन्या अनुत्पादित झाडांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी छाटणी केलेल्या झाडाचे खोडकिडीपासून संरक्षण करण्याचे आव्हान बागायतदारांपुढे आहे. बदलत्या वातावरणाचा परिणाम दरवर्षी आंबा हंगामावर होतो.
यंदाही दिवाळीच्या आरंभी थंडीला सुरुवात झाली होती; मात्र पुढे सातत्य न राहिल्यामुळे नोव्हेंबरच्या सुरुवातीला कलमांना मोहोर येणे अपेक्षित होते. यंदा सर्वाधिक झाडांना पालवी आलेली आहे. हे चित्र प्रथमच दिसत आहे. परिणामी हंगामाचे गणित आताच सांगणे अशक्य असल्याचे बागायतदारांकडून सांगितले जात आहे. पालवी आलेल्या झाडांना मोहार येणार, त्यानंतर पुढे कणी तयार होणार यामध्ये पंधरा दिवस हंगाम लांबू शकतो.
यापुढे २५ टक्के थंडीत वाढ झाली तर १५ डिसेंबरपर्यंत हंगामाचे चित्र स्पष्ट होईल. बागायतदारांच्या सुदैवाने शनिवारपासून (ता. १२) मतलई वारे वाहू लागले आहेत. पुढे थंडी वाढली तर चार ते पाच आठवड्यात पालवी जून होईल; मात्र हवामान ढगाळ राहिले तर बागायतदारांना फवारणीचा खर्च करावा लागेल.
कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे दक्षिण कोकणात हलका पावसाची शक्यता वर्तविली आहे. उत्तर कोकणात पडेल असे नाही; मात्र दक्षिणेकडे पाऊस पडला तरीही त्याचा परिणाम उत्तरेतील भागात होऊ शकतो. त्यामुळे पालवीसह मोहोर आलेल्या आंब्याच्या झाडांवर रोगराई पसरू शकते.- डॉ. विवेक भिडे, आंबा बागायतदार
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.