
Sangli News : मायथळ (ता. जत) येथील म्हैसाळच्या कालव्यामधून सहा गावांचा प्रश्न मार्गी लागणार होता, पण वन विभागाने कालव्याचे सुरू असलेले काम बंद केले. त्यामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी वन विभागाकडे आर्त विनवणी केल्या, हातपाय जोडले, अन् शेवटी ‘साहेब, आमच्या पिढ्या न् पिढ्या पाण्याच्या प्रतीक्षेतच गेल्या.
आता कामाला विरोध करू नका. आमची परिस्थिती वाईट आहे,’ अशी भावना अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केली. त्यानंतरही अधिकारी आपल्याच भूमिकेवर ठाम राहिले. यामुळे दुष्काळी जनतेमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जत तालुक्यातील माडग्याळसह सहा गावांना म्हैसाळ योजनेतून पाणी मिळावे, म्हणून मायथळ कालव्यामधून चर खोदून माडग्याळच्या तलावात पाणी सोडावे, अशी शेतकऱ्यांची गेल्या तीन वर्षांपासून मागणी होती. जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनीही खासदार संजय पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
यासाठी खासदारांनी जिल्हाधिकाऱ्यांची संमती घेऊन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि लोकभावना लक्षात घेत चरखोदाईसाठी शासनाची यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली. तसेच खासदार निधीतून बारा लाख रुपये डिझेलसाठी दिले होते. या कामास रडतखडत सुरुवात झाली.
मात्र, शुक्रवारी (ता. २५) वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी, ‘संबंधित जागा ही आमची आहे. या जागेवर खोदता येणार नाही,’ असे सांगून काम बंद पाडले. काम बंद पडताच शेतकऱ्यांच्या डोळ्यांतून अक्षरशः पाण्याच्या धारा वाहू लागल्या. ‘साहेब, खूप वाईट परिस्थिती आहे. काम बंद करू नकास’ म्हणत अधिकाऱ्यांचे पाय धरले. '
या वेळी शेतकऱ्यांनी प्रचंड आक्रोश केला, तरीही वन विभागाने हे काम सुरू होऊ दिले नाही. त्यामुळे चारशेहून अधिक शेतकरी माळावर ठाण मांडून बसून होते. हा प्रश्न समोपचाराने न सुटल्यास शेतकऱ्यांमध्ये उद्रेकाची लाट पसरेल, असे स्थिती येणाऱ्या काळात उद्भवू शकते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.