
मुंबई : बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या (Barsu Oil Refinery Project) भूसंपादनाचे काम स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन करत असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी बुधवारी (ता. २३) सांगितले. रत्नागिरी येथील बारसू या गावात सुरू होत असलेल्या तेल शुद्धीकरण प्रकल्पासंदर्भात आज महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यासंदर्भातील माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत उद्योगमंत्री उदय सामंत बोलत होते.
या तेल शुद्धीकरण प्रकल्पाबाबत उद्योगमंत्री श्री. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या वेळी आमदार राजन साळवी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी होणारे भूसंपादन, पाणीपुरवठा आदी मुद्द्यांवर या वेळी सविस्तर चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
श्री. सामंत पुढे म्हणाले, की या प्रकल्पासाठी शिवणे, देवाचे गोटणे या गावांचे भूसंपादन होणार नाही. तर सोलगाव हे गाव कायमचे वगळण्यात येईल आणि या भागात आदर्शवत असे कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येईल. या भागातील ७० ते ८० टक्के शेतकरी आणि स्थानिकांनी या प्रकल्पाला पाठिंबा दाखविला आहे. या प्रकल्पाबाबत असलेले जनतेचे गैरसमज दूर केले जातील. याशिवाय जमिनीच्या दराबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली जाईल, तसेच एकूण पॅकेजची माहिती शेतकऱ्यांना, स्थानिकांना देण्यात येईल, असे श्री. सामंत यांनी स्पष्ट केले.
बारसू येथील तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी एकूण ६२०० एकर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यापैकी २९०० एकर जमीन संपादित करण्यात आली असून, या प्रकल्पामुळे दोन लाख कोटींची थेट गुंतवणूक होणार आहे. यातून सुमारे एक लाख रोजगार निर्माण होणार आहेत.
रिफायनरी बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय :
- पाण्याची व्यवस्था : प्रकल्पासाठी कोयना धरणातून पाणी आणण्यास आज तत्त्वतः मान्यता देण्यात आली. या मार्गावरील गावांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येईल. या पाण्याचा वापर जिल्ह्यातील इतर भागांनाही होईल. १६० एमएलटी पाणी कंपनीला लागणार आहे.
- राजापूर शहर अर्जुना व खोदवली नदी पात्रातील गाळ काढणे आवश्यक आहे. राजापूर नगर परिषद, नाम फाउंडेशन आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने गाळ उपसा करण्यात येणार असून, माध्यमातून किमान ५ लाख क्युबिक मीटर गाळ काढला जाईल.
- प्रकल्पासोबत या भागात एक अद्ययावत असे सुपर स्पेशालिटी रुग्णालय निर्माण करण्यात येईल. ओणी येथे उपलब्ध असणारे रुग्णालय तत्काळ सुरू करण्यात येईल. इथे लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.
- मुंबई- गोवा महामार्ग रस्त्यालगत सुमारे एक लाख वृक्ष लावण्यात येणार आहेत. आंबा, काजू यांची झाडे लावण्यास प्राधान्य देण्यात येईल.
- समाज माध्यमे, मुद्रित माध्यमे, दृकश्राव्य माध्यमे यांच्या साह्याने व्यापक जनजागृती करून नागरिकांचे प्रकल्पाविषयी असलेले गैरसमज दूर करण्यात येतील.
- या प्रकल्पासाठी शिवणे, देवाचे गोटणे या गावांचे भूसंपादन होणार नाही. तर सोलगाव हे गाव कायमचे वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. याच भागात आदर्शवत असे कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येईल.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.