
APMC Election Update Pune: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी (APMC Election) अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये कोणताही शेतकरी उमेदवारी करू शकणार आहे. मात्र तो कोणत्या गटातून, कोणत्या जागेवर अन् किती संख्येने असे अनेक प्रश्न समजून घेताना इच्छुकांच्या नाकीनऊ येत आहे.
कागदपत्रे जमविण्यासाठी एकच धावपळ करावी लागत असून अनामत रक्कमही पाच हजार रुपये ठेवल्याने काही इच्छुक उमेदवारीला ब्रेक लागणार आहे. विशेषतः नवीन निकष समजून घेताना अधिकाऱ्यांवरही नेते व इच्छुकांच्या प्रश्नांची सरबत्ती होत आहे.
सोसायटी व ग्रामपंचायत गटातून कुठलाही शेतकरी उमेदवारी अर्ज दाखल करू शकणार आहे. त्यासाठी या संस्थांचा सदस्य असलाच पाहिजे ही अट नाही.
मात्र या दोन्ही गटांत सुमारे १५च्या आसपास जागा असल्याने या १५ जागांवर फक्त शेतकरीच निवडून देऊ शकतील का, तसेच सोसायटी व ग्रामपंचायत सदस्य असला तरी त्याला शेतकरी असल्याच्या दाखल्याची आवश्यकता आहे का, एक गटात किती शेतकरी उभे राहू शकतील, असे गुंतागुंतीचे प्रश्न अनेक इच्छुकांना पडत आहेत.
शेतकरी गटातून उमेदवारी करण्यासाठी चालू तारखेचा ८ ‘अ’ व सात-बारा उतारा, शेतकरी असल्याचा दाखला आवश्यक असून गाव पातळीवर तलाठ्याकडून हे दाखले मिळवण्यासाठी चांगलीच धावपळ सुरू आहे.
दहा गुंठे क्षेत्र धारण करणाऱ्या शेतकऱ्यास सोसायटी व ग्रामपंचायत या मतदारसंघातून उमेदवार होता येणार आहे. मतदारयादीत असलेली व्यक्तीच शेतकरी उमेदवाराला सूचक व अनुमोदक होऊ शकणार आहे.
आरक्षित राखीव जागेवर लढणाऱ्या उमेदवाराला जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. यावेळी उमेदवारी अर्जाची किंमत २०० रुपये असून उमेदवाराला पाच हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे.
राखीव जागेसाठी एक हजार रुपये अनामत रक्कम आहे. बाजार समितीची काही थकबाकी असल्यास कोणालाही उमेदवारी करता येणार नाही असे नियम असल्याने अनेक इच्छुक अर्ज दाखल करण्यापूर्वीच बाद झाले आहेत.
दहा बाजार समितींच्या निवडणुका
जिल्ह्यातील दहा कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणुकांचे वातावरण तापू लागले असून, राजकीय घडामोडींकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, बाजार समितीसाठी यंदा राजकारण विधानसभेच्या तोडीचे होण्याची शक्यता आहे.
सर्व राजकीय गणिते गुंतागुंतीची
बाजार समितींच्या सत्ताकारणाचा फायदा सहकाराच्या माध्यमातून होतो. पण इतर मोठ्या निवडणुकांसाठी येथील सत्तेचा फायदाही होत आला आहे. त्यामुळे बाजार समिती आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी नक्कीच सर्वच गट शर्थीचे प्रयत्न करू लागले आहेत.
दरम्यान, यावेळी सर्व राजकीय गणिते गुंतागुंतीची बनली असल्याने आगामी घडामोडींकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. नेत्यांच्या हालचाली व संभाव्य पॅनेलनिर्मितीविषयी देखील तर्कवितर्क लढविले जात आहेत.
असे आहेत मतदार..!
नव्या नियमानुसार कुठल्याही गटातून शेतकरी व पात्र असलेला व्यक्ती उमेदवारी करू शकणार आहे. त्यामुळे पॅनेलसह इच्छुकांचे पेव फुटताना दिसेल. त्याचवेळी मतदारसंख्या मात्र मर्यादित असल्याने मतदारांना आपलेसे करण्यासाठी नेतेमंडळींना शर्थीचे प्रयत्न करावे लागतील असे चित्र आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.