
Ratnagiri News : जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या भाज्यांची आवक ४० टक्क्यांनी घटल्यामुळे भाज्यांचे दर वधारले आहेत. घेवडा, गवार, फरसबी, हिरवी मिरची, मटार आणि भेंडी आदी भाज्यांचा किलोचा दर शंभर रुपयांपेक्षा अधिक आहे. गेले महिनाभर रत्नागिरीत भाज्यांच्या दरात वाढ दिसून येत आहे.
जिल्ह्यात प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातून भाजीपाला येतो. काही स्थानिक शेतकरी असले तरी त्यांचा भाजीपाला किरकोळ स्वरूपात येतो. जिल्ह्यात दरदिवशी पश्चिम महाराष्ट्रातून साधारण १० टनांहून अधिक भाजी येते. कृषी उत्पन्न बाजार समितीकडून या भाज्यांचा लिलाव केला जातो. त्यानंतर व्यापाऱ्यांच्या माध्यमातून त्यांची विक्री होते.
शनिवार आणि मंगळवारच्या आठवडा बाजारात चांगली आवक होते; परंतु मागणीच्या तुलनेत भाज्यांचे उत्पादन घटल्याने जिल्ह्यात येणाऱ्या भाजीची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. महिनाभरापासून २०, ३० आता तर ४० टक्के भाज्यांची आवक घटली आहे. त्यात अधिकचा श्रावण महिना असल्याने भाज्यांची मागणी वाढली आहे.
महिनाभरापूर्वी ज्या भाज्या ३० ते ४० रुपये किलो मिळत होत्या, त्या आता ७० ते ८० रुपयांवर गेल्या आहेत. घाऊक व्यापाऱ्यांपेक्षा बाजारात या भाज्यांचे दर आता गगनाला भिडले आहेत. घेवडा, गवार, फरस बी, हिरवी मिरची, मटार आणि भेंडी आदींचे दर १०० रुपये किलोच्या वर गेले आहेत.
राजभाज्यांकडे कल वाढला
रत्नागिरीच्या मुख्य भाजीमंडईमधून आढावा घेतला असता गेल्या महिनाभरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे पाणी साचून राहिल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले. पावसाचा फटका पश्चिम महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात बसला. यामुळे रत्नागिरीला जाणाऱ्या भाज्यांची आवक घटली आहे. त्यामुळे अनेकांचा कल रानभाज्यांकडे वाढला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.