
अॅग्रोवन वृत्तसेवा
Fertilizer News in Maharashtra : जळगाव ः खरिपात खतांची मागणी सुरू होताच कृत्रिम टंचाई व लिकींगने गती घेतली आहे. यातच बनावट खतांचा बाजारही वेगात सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांची नाडवणूक होत असून, कृषी विभाग बघ्याची भूमिका घेत आहे.
खतांचा पुरवठा सुरळीत असल्याच्या बाता सुरुवातीपासून कृषी विभाग करीत आहे. परंतु मागील १० ते १२ दिवसांपासून १०.२६.२६ हे खत मिळत नसल्याची स्थिती आहे. त्याचा रेक सोमवारी (ता.१७) दाखल झाला. परंतु त्यातील खते पुरेशी नसल्याने टंचाई दूर होवू शकली नाही. तसेच युरियाचीदेखील टंचाई आहे.
एका शेतकऱ्याला तीन ते चारच गोण्या युरिया देण्यात येत आहेत. काही विक्रेते आपल्या मोठ्या ग्राहकांनाच अधिकची किंवा हवी तेवढी खते देत आहेत. इतर ग्राहकांना पाच युरियाच्या गोण्यांसोबत इतर अन्नद्रव्ये घेण्याची सक्ती केली जात असून, यामुळे २६६ रुपयांची युरियाची गोणी ३५० रुपयांना पडत आहे किंवा उत्पादन खर्च वाढत आहे.
एका कंपनीकडून जिल्ह्यात १०.२६.२६चा अल्प पुरवठा झाला आहे. या कंपनीचा २२०० टन १०.२६.२६ शिल्लक असल्याचे सांगितले जात आहे.
पण हे खत जळगाव शहरात कुठेही शेतकऱ्यांना उपलब्ध नाही. तसेच त्यावर नॅनो युरिया व इतर अन्नद्रव्यांची सर्रास लिंकींग केली जात आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे. यातच हवी ती खते मिळत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत.
खरिपाच्या सुरवातीला कृषी विभागाने बियाणे व खते मुबलक असल्याचे पत्र जारी केले होते. तसेच डीएपीचा वापरच खरिपात जिल्ह्यात होत नाही. त्याचा मुद्दाच नाही, अशी भूमिकादेखील मध्यंतरी कृषी विभागाने घेतली होती. परंतु खतांची कृत्रीम टंचाई आहे, लिंकींग वेगात सुरू आहे, याबाबत कृषी विभाग स्पष्टपणे बोलत नाही. कंपन्याच मुजोरी करतात, असे विक्रेते व कृषी विभागाचे म्हणणे आहे.
बोगस खतांचा सुळसुळाट
जिल्ह्यात खतटंचाई असतानाच गुजरातमधून बोगस कीडनाशके व खते येत आहेत. जामनेर, पारोळा, एरंडोल, चोपडा, चाळीसगाव, भडगाव आदी भागात या खतांची बिनबोभाट विक्री झाली आहे. जामनेरात शेतकऱ्यांनी या समस्येबाबत आंदोलन केल्यानंतर कृषी विभाग जागा झाला व कारवाई सुरू झाली.
परंतु या खतांच्या वापराने जामनेरातील तोंडापूर व परिसरात सुमारे २०० हेक्टरवरील कापूस पिकाचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच बोगस कीडनाशकेदेखील येत असून, शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. विशेष म्हणजे विनापावती त्यांची विक्री झाली. कृषी विभाग म्हणतो पावत्या आणा व लेखी तक्रारी द्या. यामुळे शेतकऱ्यांची अधिकची अडचण होत आहे.
जिल्ह्यात खते मुबलक आहेत. १०.२६.२६ची मागणी आहे. त्याचा सर्वांनाच पुरवठा एकाच वेळी करताना अडचण येते. इतर खते बाजारात आहेत. बनावट खतांबाबत आम्ही कारवाईसत्र राबविले आहे.
- विजय पवार, मोहीम अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.