
Buldana News : जुलै महिन्यात आलेल्या महापुरामुळे नुकसान झालेल्यांना शासनाची मदत मिळाली नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी सोमवारपासून (ता. २८) जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले.
२२ जुलैला झालेल्या अतिवृष्टीने हजारो एकर जमीन पिकांसह खरडून गेली आहे. विहिरी जमीनदोस्त झाल्या असून शेती उपयुक्त साहित्य वाहून गेले. अनेक गावांत पुराचे पाणी शिरल्याने घरे वाहून गेल्याने अनेक परिवार बेघर झाले. घरांची पडझड झाली. घरातील अन्नधान्य व सामानाची नासधूस झाली.
अनेक गावांत अधिकाऱ्यांनी तोंड पाहून पंचनामे केल्याने खरे लाभार्थी सानुग्रह अनुदानापासुन वंचित राहिले आहेत. मृत जनावरे कोसोदूर वाहून गेली. पुन्हा अशी अतिवृष्टी झाल्यास धोका असणाऱ्या नदीकाठच्या गावांचे पुनर्वसन करण्यासाठी अनेक गावांतील नागरिकांची मागणी आहे.
जळगाव व संग्रामपूर तालुक्यात निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाल्यामुळे तालुक्यातील बंधाऱ्यांची पडझड झाली. त्या पाण्याचा प्रवाह प्रचंड प्रमाणात असल्याने शेतातील बांध फुटले. खरडून गेलेल्या जमिनीचा पोत बिघडला असून चार-सहा वर्षे जमिनी सुपीक होऊ शकणार नाहीत. अशा शेतकऱ्यांचे सरकारने कर्ज माफ करावे.
शेतातील विद्युत खांब कोलमडले व तारा तुटून पडल्या असल्यामुळे कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. याकडे सरकार गांभीर्याने पहायला तयार नाही. या नुकसानीचा पूरग्रस्तांना मोबदला मिळवून देण्यासाठी डिक्कर यांनी सोमवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.