
Sindhudurg News : हत्तींना रोखण्याचे बहुतांशी पर्याय कुचकामी ठरल्यानंतर आता वनविभागाने हत्तींना नैसर्गिक अधिवासात हटविण्यासाठी पश्चिम बंगालच्या विशेष हाकारी पथकाला पाचारण केले आहे. हे पथक जूनच्या पहिल्या आठवड्यात सिंधुदुर्गात दाखल होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुकारलेले अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित केले आहे.
तिलारी खोऱ्यातील अनेक गावांमध्ये हत्तींचा वावर असतो. हत्तींच्या कळपाकडून सतत शेती, बागायतीचे नुकसान होत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. हत्तींना हटवावे यासाठी शेतकऱ्यांनी अनेकदा आंदोलने केली.
वनविभागाने देखील विविध उपाययोजना केल्या. परंतु त्यात अपेक्षित यश वनविभागाला आलेले नाही. दरम्यान मोर्ले, केर, घोटगेवाडीसह अन्य गावांतील शेतकऱ्यांनी हत्तींचा बंदोबस्त करा, अन्यथा २५ मेपासून अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा वनविभागाला दिला होता.
त्या अनुषंगाने वनविभागाने हत्तींना नैसर्गिक अधिवासात हटविण्यासाठी पश्चिम बंगालच्या हाकारी पथकाला पाचारण केलेले आहे. हे पथक जूनच्या पहिल्या आठवड्यात सिंधुदुर्गात दाखल होणार आहे. त्यानंतर हत्तींना नैसर्गिक अधिवासात नेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन वनक्षेत्रपाल अरूप कन्नमवार यांनी शेतकऱ्यांना दिले.
याशिवाय पंचनाम्यातील जाचक अट्टी रद्द करण्यात येतील, हत्तींचा वावर असलेल्या गावांमध्ये २४ तास कर्मचारी नेमण्यात येतील. गावात अधिकाऱ्यांची यादी आणि त्यांचे मोबाइल क्रमांक प्रसिद्ध करण्यात येतील, अशी आश्वासने देखील श्री. कन्नमवार यांनी शेतकऱ्यांना दिली. त्यामुळे २५ रोजी पुकारलेले अन्नत्याग आंदोलन शेतकऱ्यांनी स्थगित केले. सरपंच गोपाळ गवस, संतोष मोर्ये यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.