
Forest Department चंद्रपूर : वन अधिकारी, कर्मचारी, वनमजूर आणि विशेष म्हणजे गावकऱ्यांच्या सहकार्यामुळेच राज्यात वनक्षेत्रात (Forest Department) २५५० चौरस किमी इतकी वाढ करू शकलो, याचा मनस्वी आनंद आहे, असे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सांगितले.
प्रियदर्शनी सांस्कृतिक सभागृह येथे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी खासदार बाळू धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, अप्पर मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, चंदनसिंह चंदेल उपसंचालक कुशाग्र पाठक, उपसंचालक (कोअर) नंदकिशोर काळे, सैनिकी शाळेचे प्रशासकीय अधिकारी देवाशिष जीना, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, तसेच सरपंच, उद्योग संस्थांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
काँक्रिटच्या जंगलापेक्षा निसर्गाच्या जंगलात राहणारे जास्त नशीबवान आहेत, असे सांगून मुनगंटीवार म्हणाले, की ईश्वरीय कार्य करण्याचे काम वनविभाग करतो. या विभागाचा मंत्री होणे हे आपले सौभाग्य आहे.
गत कार्यकाळात राज्याचा अर्थमंत्री म्हणून देशात सर्वोत्तम ११९७५ हजार कोटींचा सरप्लस अर्थसंकल्प सादर करण्याचा मान मिळाला. वनमंत्री आणि धनमंत्री असल्यामुळेच असा सरप्लस अर्थसंकल्प मांडू शकलो.
राज्यात सर्वांच्या सहकार्याने वनक्षेत्रात वाढ झाली असून ती तब्बल २५५० चौरस किमी आहे. तसेच देशात महाराष्ट्राने सर्वांत जास्त मँग्रोजचे क्षेत्र वाढविले आहे.
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी याची दखल घेतली असून महाराष्ट्राच्या या अभिनव प्रकल्पाचे केंद्राने कौतुक केले आहे.
ते म्हणाले, की तेंदुपत्ता हा रोजगाराचा एक घटक आहे. रॉयल्टी बोनस देतांना केवळ २५ टक्के निधी देण्यात येत होता; मात्र वनमंत्री म्हणून आपण आस्थापनेचा खर्च कमी करून तेंदुपत्ता बोनससाठी ७२ कोटींची तरतूद केली आहे.
वन्यजीव-मानव संघर्षात वाढ झाली आहे, हे मान्य करून वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले, वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तिच्या कुटुंबियांना देण्यात येणारी मदत २ लाखांवरून आता २० लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे.
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूच होणार नाही, याबाबत नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी केंद्रीय वनमंत्री भुपेंद्र यादव यांच्याशी चर्चा सुरू असून वन्यप्राणी जेव्हा गावात येतात, त्याची पूर्वकल्पना देता येईल का, याबाबत विचार सुरू आहे.
८० टक्के मृत्यू हे जंगलात होतात. त्यामुळे गावकऱ्यांचे जंगलावरचे अवलंबित्व कमी करावे लागेल. यासाठी स्थानिकांना रोजगार देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थेसोबत काम सुरू आहे.
- सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री, महाराष्ट्र राज्य
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.