
Pradhan Mantri Fasal Bima Yojana : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील १९ हजार ५१५ शेतकऱ्यांनी एक रुपयात विमा उतरवला आहे. यामध्ये भात पिकातील १८ हजार ७९८ तर नाचणीचे ७१७ शेतकरी आहेत.
कृषी विभागाकडून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा सहा पट वाढ झाली आहे. तीन दिवसांच्या वाढीव मुदतीमध्येही दहा हजार शेतकऱ्यांनी विमा उतरवला.
पूर्वी पीक विम्याच्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागत होती. मात्र, यंदा एक रुपयात पीकविमा योजना शासनाने जाहीर केली. ३१ जुलैपर्यंत याची अंतिम मुदत होती; परंतु मुसळधार पाऊस, शेतीची चालू असलेली कामे यामुळे तीन दिवस मुदत शासनाने वाढवली होती. जिल्ह्यात भातासाठी हेक्टरी ५० हजार तर नागलीसाठी २० हजार रुपये विमा रक्कम संरक्षित केली आहे.
सध्या ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यात दोन्ही पिकांचे मिळून १० हजार २९६ शेतकऱ्यांनी विमा उतरवला होता. वाढीव मुदतीत दहा हजार शेतकऱ्यांची भर पडली. त्यामुळे मुदत संपल्यानंतर १९ हजार ५१५ शेतकऱ्यांचे ५ हजार ७३ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले. जिल्ह्यातून २४ कोटी ७५ लाख ६१ हजार ९३६ रुपयांची रक्कम संरक्षित झाली आहे.
यंदा मोसमी पाऊस लांबल्यामुळे खरिपातील लावण्यांची कामे उशिराने झाली. दहा वर्षांतील पावसाची अनियमितता पाहता कापणीच्यावेळी शेतकऱ्यांना अवकाळी पावसातील नुकसानीला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे विमा काढलेल्या शेतकऱ्यांना नुकसानीचा लाभ मिळू शकतो. मागील दोन वर्षांत विम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला होता.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.