
नाशिक : मुरंबी (ता. इगतपुरी) येथील शेतकरी दशरथ मोतीराम मते आणि विशाल दशरथ मते यांनी ‘ननहेम्स इंडिया प्रा. लिमिटेड’ मेडचल (हैदराबाद) या कंपनीची १६ पाकिटे दोडका बियाणे १२ हजार ४८० रुपयांना वाडीवऱ्हे येथील श्रीनिवास कृषी उद्योग यांच्याकडून खरेदी केले. मात्र लागवडीनंतर उत्पादन हाती न आल्याने शेतकऱ्यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे धाव घेतली. त्यानंतर आयोगाने प्रकरण पडताळून बियाणे कंपनीला बाजारभावाच्या सरासरी ७ हजार रुपये शेतकऱ्याला तब्बल १४ लाख ४३ हजार ७५० रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
शिवाय शारीरिक व मानसिक त्रासापोटी १५ हजार, तर तक्रार अर्जाचा खर्च १० हजार रुपये अदा करण्याचे आदेश दिल्याने बियाणे उत्पादक कंपनीला दणका दिला आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी, की शेतकऱ्याने १६ जून २०२० रोजी बियाणे खरेदी करून विक्रेत्याच्या सल्ल्यानुसार दोडक्याची १७ जून रोजी लागवड केली. परंतु पुढे पिकाची वाढ होऊन दोन-अडीच महिन्यांचा काळ लोटला तरीही दोडक्याचे उत्पादन हाती आले नाही.
ही बाब शेतकऱ्याने संबंधित बियाणे कंपनी प्रतिनिधी गायकवाड यांच्या लक्षात आणून दिली. त्यांनी नुकसानभरपाई देण्याचे मान्य केले, पण ती दिली नाही. यावर शेतकऱ्याने २४ ऑगस्ट २०२० रोजी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यांनी २६ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला. त्यामध्ये नर फुलांचे प्रमाण अधिक होते, तर फळधारणा होणाऱ्या मादी फुलांचे प्रमाण या ठिकाणी आढळून आले नाही. त्यामुळे दोडक्याला फळधारणा न झाल्याचे व सदोष बियाण्यांमुळे घडल्याचा निष्कर्ष तालुका कृषी अधिकाऱ्यांनी नोंदविला.
यासह बियाणे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले नसल्याचा युक्तिवाद करण्याचा प्रयत्न केला. यासह शेतकऱ्याने खोटी तक्रार केल्याची बाजू मांडण्यात आली. मात्र राष्ट्रीय आयोगाने अलीकडेच दिलेल्या अनेक न्यायनिर्णयात असे स्पष्ट केले आहे की, पेरण्यात आलेल्या बियाण्याचा नमुना प्रयोगशाळेत तपासण्यात येईल. मात्र त्याचा अहवाल मंचासमोर नसल्यास, अशा प्रकारे शास्त्रज्ञांचा समावेश असलेल्या समितीचा अहवाल ग्राह्य धरण्यात यावा, अशा आशयाचा निर्वाळा दिला.
बियाणे कंपनी जबाबदार; विक्रेत्यास क्लीनचिट
नुकसानभरपाईपोटी २६ ऑगस्ट २०२० पासून ते प्रत्यक्ष रक्कम हाती मिळण्यापर्यंत ९ टक्के व्याजासह १४ लाख ४३ हजार ७५० रुपये देण्यात यावेत. तसेच कंपनीने शारीरिक व मानसिक त्रासापोटी १५ हजार व तक्रार अर्जाचा खर्च १० हजार अदा करावेत असे आदेश दिले आहेत. ग्राहक आयोगाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे यांनी हा निकाल दिला आहे. प्रेरणा काळुंखे-कुलकर्णी आणि सचिन शिंपी हे आयोगाचे सदस्य आहेत. बियाणे पाकिटबंद असल्याने नुकसान भरपाईस विक्रेत्यास ग्राह्य धरले जाणार नाही, असे मत मांडल्याने विक्रेत्यास क्लीनचिट मिळाली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.