
सांगली जिल्ह्याच्या पश्चिमेकडील शेवटचे टोक म्हणजे शिराळा. डोंगराळ भाग, चारही बाजूला ऊस, भात आदींची शेती आहे. येथील भुईकोट किल्याला (Bhuikot Fort) छत्रपती संभाजी महाराज यांच्यामुळे ऐतिहासिक वारसा आहे. त्यांच्या काळात गोळा होत असलेल्या ३२ गावांच्या महसुलामुळे या गावाला बत्तीस शिराळा (battis Shirala) असे नाव पडले आहे. गोरक्षनाथ, भवानीमाता, तसेच समर्थ रामदास स्वामी स्थापित ११ मारुतीपैकी एक अशी विविध पुरातन मंदिरे येथे आहेत. नागपंचमी म्हटले की बत्तीस शिराळा असाच गावाचा सर्वत्र लौकिक होता. आणि आजही आहे. सर्प हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. त्याचे महत्त्व लक्षात घेऊन नागपंचमी (Nagpanchami) दिवशी त्यांचा मान ठेवणे, पूजा करणे यापुढे जाऊन वर्षभरच त्यांचे संवर्धन व काळजी घेणे यासाठी गावातील प्रत्येकजण जागरूक असतो. सर्पसृष्टीला या भागात निर्धोकपणे वास्तव्य करण्यासंबंधी करवीर निवासिनी अंबामातेने आशीर्वाद दिल्याची आख्यायिका वा धार्मिक दंतकथा सांगण्यात येते.
अशी आहे आख्यायिका
बाराव्या शतकात महायोगी गोरक्षनाथ लोकप्रबोधन करीत शिराळ्यात आले. श्रावण शुद्ध पंचमीदिवशी भिक्षा मागण्यासाठी ते गावातील महाजन यांच्या घरी गेले असताना गृहिणी मातीच्या नागाची पूजा करीत होती. भिक्षा द्यायला वेळ का झाला? या नाथांच्या प्रश्नावर तिने पूजेचे कारण सांगितले. जिवंत नागाची पूजा करणार का? असा प्रतिप्रश्न केल्यावर तिने होकार दिला. तेव्हापासून शिराळा येथे जिवंत नागाची पूजा करण्यास प्रारंभ झाला. येथील भगिनी नागाला भाऊ मानत असल्याने नागपंचमी दिवशी आजही स्वयंपाकात लाटणे, तळणे, भाजणे असे प्रकार केले जात नाहीत. कारण सूक्ष्मजीवांच्या रूपाने तो स्वयंपाकात येईल, त्यास इजा होईल अशी धारणा आहे. पूर्वी नागपंचमीदिवशी नागांची मिरवणूक ट्रॅक्टर ट्रॉलीवरून काढली जायची.
कायद्यानुसार होते पूजा
सन २००२ च्या दरम्यान काही पर्यावरणप्रेमींनी जिवंत नागाच्या पुजेवर आक्षेप घेत न्यायालयात याचिका दाखल केली. याबाबत अनेक सुनावण्या झाल्या. त्यातून २०१२ मध्ये जिवंत नागाची पूजा करण्यावर कायदेशीर बंधने घालण्यात आली. तेव्हापासून कायद्यानुसार जिवंत नागाची जागा मातीच्या नाग प्रतिमेने घेतली आहे. शिराळकर आता त्यानुसार प्रतिमेची पूजा करतात. गावातून नागाची पालखीतून मिरवणूक काढून पूजाही करण्यात येते. गावकरी सांगतात की वीस वर्षापूर्वी नागपंचमी सणादिवशी गावातील कोतवाल शेतातील नाग पकडून आणायचे. पालखी पकडण्याचा मान भोई समाज, वाद्य वाजवण्यासाठी डवरी समाज अशा प्रकारे बारा बलुतेदारांना या सणामध्ये मोठे महत्त्व देण्यात आले. आज नागाची प्रतिकात्मक पूजा होत असली तरी बारा बलुतेदार आपली जबाबदारी तितक्याच भक्तिभावाने निभावतात. नागपंचमी दिवशी मुकुंदराव किर्लोस्कर यांनी शिराळ्यात नागपंचमी कशा प्रकारे साजरी केली जाते याची माहिती १९५४ मध्ये नागपंचमीची दिवशी किर्लोस्कर मासिकात प्रसिद्धी झाली. त्याची चित्रफीत अमेरिकेत दाखवली. नॅशनल जिऑग्राफी चॅनेलने शिराळ्यात येऊन त्यास प्रसिद्धी दिली.
वन्य जीव व सर्पांचे संवर्धन
गावातील प्रणव महाजन यांनी २०१६ मध्ये ‘प्लॅनेट अर्थ फाउंडेशन संस्था स्थापन केली. ती वन विभागाशी संलग्न आहे. या माध्यमातून पर्यावरण अर्थात पशू-पक्षी, झाडे रोपण व संवर्धन यामध्ये संस्था कार्यरत आहे. शिराळा डोंगरी तालुका असल्याने येथे वन्यजीवांची संख्या जास्त आहे. त्यामुळे त्यांचे संरक्षण करण्यासाठी तालुक्यातील ९१ गावांत जनजागृती केली आहे. शिराळा परिसरात सुमारे २० हून अधिक जातीचे सर्प (विषारी आणि बिनविषारी) आढळतात. यात नाग, घोणस, मण्यार, तस्कर, धामण, कुकरी, हरण टोळ आदींचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांपासून वृक्षतोड, शहरीकरण यामुळे इथल्या सर्पांचा अधिवास बदलला आहे. सर्प हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. साहजिकच गावातील जवळपास प्रत्येकास पिढ्यानपिढ्या योग्य रित्या सर्प पकडण्याचे ज्ञान अवगत आहे. शेतात काम करतेवेळी इजा झालेला सर्प, वन्य प्राणी यांची नोंद वनविभागाकडे केली जाते. त्यांच्यावर संबंधित पशुवैद्यकांकडून उपचार केले जातात. त्यांना पुन्हा अधिवासात सोडले जाते. इथे कोणत्याही ठिकाणी नाग दिसला तर त्याला इजा होऊ नये याची काळजी देखील घेतली जाते.
संभाजी गायकवाड- ९४०३९४३५३६
अध्यक्ष, अंबामाता मंदिर ट्रस्ट
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.