Desi Cucumber Farming Success Story: अंकली (जि. सांगली) या कृष्णामाईच्या कुशीतील गावात, अर्थात ऊस पट्ट्यात देशी काकडीच्या शेतीत शांतिनाथ पाटील व कुटुंबाने दमदार ओळख निर्माण केली आहे. सुमारे तीस वर्षांपासून त्यांनी या काकडीचे बियाणे मोठ्या कौशल्याने व कष्टाने जोपासले आहे. वर्षभरातील तीन हंगामांमध्ये या काकडीचे उत्पादन घेण्याचे तंत्र आत्मसात करून गुणवत्तापूर्ण उत्पादनाला दरवर्षी उत्तम दर मिळवण्यातही पाटील तरबेज झाले आहेत. .सां गली शहरापासून अवघ्या पाच- सात किलोमीटर अंतरावर कृष्णामाईच्या कुशीत विसावलेलं आणि सांगली- कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेलं अंकली हे गाव. शेतीप्रश्नांसह विविध जनआंदोलनांचं केंद्र म्हणून अंकली फाटा या नावानं देखील ते परिचित आहे. इथल्या कृष्णा नदीचं संथ, शांत आणि मन मोहून टाकणारं पात्र आहे..पण याच नदीनं २०१९ आणि २०२१ मधील महापूरात रौद्ररूप धारण केलं. गावाला अक्षरशः कवेत घेतलं. डोळ्यांदेखत शेती पाण्याखाली गेली. तरीही शेतकरी खचला नाही. संकटाशी दोन हात करत तो नव्या उमेदीनं शेती करू लागला. आज गावातील सुमारे ९० टक्के क्षेत्र उसाखाली असून येथील अर्थकारणाचं प्रमुख आधार हेच पीक आहे..नोकरीपेक्षा शेतीतच मन रमलंगावातील शांतिनाथ पाटील यांची शेती तीन एकर. घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाची वाट न सोडता १९७९ मध्ये त्यांनी बीकॉमची पदवी संपादन केली. त्या काळात नोकरी लागली असती. मात्र नोकरीच्या सुरक्षित मार्गापेक्षा त्यांना मातीची अधिक ओढ होती. त्यामुळे स्वतःच्या तीन एकरांसह इतरांची शेतीही वाट्याने करावयास घेतली. ऊस आणि काकडी ही त्यांची मुख्य पिके राहिली. त्यातून आर्थिक बळ मिळवले. मुलांनी उच्च शिक्षण घ्यावे ही जिद्द होती. त्यातून मुलगा स्वप्नीलने इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेतून बीईचे तर दुसरा मुलगा संदीपने एमटेकची पदवी मिळवली. नोकरीपेक्षा माझं मन शेतातच अधिक रमलं असे शांतिनाथ सांगतात..Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल .कुटुंबाचा सहभाग महत्त्वाचाप्रतिकूल परिस्थितीने अनेक अडथळे उभे केले. पण शांतिनाथ यांनी कष्टांची साथ सोडली नाही. जिद्द, सातत्य, प्रयोगशील वृत्तीच्या बळावर ते नवे मार्ग शोधत गेले. ते सांगतात की शेती हा एका व्यक्तीचा नव्हे, संपूर्ण कुटुंबाचा प्रवास असतो. स्वप्नील यांची आई सुनिता, पत्नी कोमल या दोघीही शेतीत खांद्याला खांदा लावून काम करतात. लागवडीपासून ते पुढे काढणी, प्रतवारी, पॅकिंगपर्यंतच्या सर्व जबाबदाऱ्यांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो..नव्या पिढीने स्वीकारलेली जबाबदारीवडिलांनी देशी काकडी शेतीचा घातलेला भक्कम पाया पुढे नेण्याची जबाबदारी स्वप्नील यांनी समर्थपणे स्वीकारली. आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालण्याचा त्यांचा दृष्टिकोन नवी दिशा देणारा ठरला. काकडीला अति पाण्याने मूळकूज होतो. अपेक्षित वाढ, गुणवत्तेवर परिणाम होतो हे त्यांच्या लक्षात आले. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी सहा वर्षांपूर्वी सच्छिद्र निचरा प्रणाली उभारली. पाटपाणी किंवा अतिवृष्टीमुळे शेतात साचणारे अतिरिक्त पाणी या प्रणालीद्वारे त्वरित बाहेर पडू लागले. परिणामी जमिनीतील हवेचा व ओलाव्याचा समतोल राखला गेला. मातीची सुपीकता टिकून राहिली. मुळांना पोषक वातावरण मिळाले. याचबरोबर मल्चिंग पेपर, ठिबक सिंचनाचा अवलंब करून पाणी व्यवस्थापन भक्कम केले..अभ्यास, अनुभव महत्त्वाचाएखाद्या पिकात सातत्यपूर्ण यश मिळवायचे तर निसर्गाची साथ असावी लागते. पिकाचा सखोल अभ्यास, व्यवस्थापन यांची प्रभावी सांगड घालणे आवश्यक असते. या बाबी शांतिनाथ अनुभवातून शिकले. किडी-रोगांचा प्रादुर्भाव, हवामानातील बदल, पाणी, अन्नद्रव्ये व्यवस्थापन आणि पिकातील सूक्ष्म बारकाव्यांचे निरीक्षण त्यांनी केले. नवीन शिकण्याची जिद्द कमी झाली नाही. याच सातत्यपूर्ण अभ्यास आणि अनुभवातून देशी काकडीचे दर्जेदार उत्पादन घेण्यात ते माहिर झाले. त्यातूनच उत्पादनाची गुणवत्ता आणि सातत्य टिकवणे शक्य झाले..देशी काकडीचे आदर्श व्यवस्थापनकाकडी लागवडीत हंगामाचे अचूक नियोजन हेच यशाचे गमक असल्याचे स्वप्नील सांगतात.वर्षभरात उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे तिन्ही हंगाम साधतात. प्रत्येक हंगामाची बाजारपेठ, मागणी आणि दर यांचा अभ्यास करून मे, डिसेंबर व फेब्रुवारी अशा तीन हंगामांमध्ये लागवडीचे नियोजन.उन्हाळ्यात काकडी मोठ्या प्रमाणात बाजारात येत असल्याने दरांत चढ-उतार होत राहतात. पावसाळ्यात आवक तुलनेने कमी असल्याने दर चांगले मिळतात.प्रत्येक हंगामात सव्वा ते दीड एकर क्षेत्र..Beekeeping Success Story: शेती भले एकच एकर, पण आयुष्याला मधाचा गोडवा.५० टक्के खरेदी बांधावरूनचविश्वास, दर्जा आणि सातत्य या त्रिसूत्रीच्या बळावर आपल्या काकडीसाठी स्वतंत्र, विश्वासार्ह मार्केट तयार केले आहे. सांगली, मिरज, जयसिंगपूर, कुरुंदवाड परिसरातील व्यापाऱ्यांशी अनेक वर्षांपासून विश्वासाचे नाते निर्माण केले आहे. त्यामुळे दररोज मागणी राहते. शेतातच प्रतवारी करून वजन केले जाते. शांतिनाथ आणि स्वप्नील हे पितापुत्र स्वतः व्यापाऱ्यांपर्यंत माल पोहोचवतात. एकूण उत्पादनापैकी सुमारे ५० टक्के खरेदी व्यापारी शेतातूनच करतात. त्यामुळे बाजार समितीतील सौद्यांवर अवलंबून राहण्याची गरज भासत नाही. वेळ, वाहतूक आणि अन्य खर्चात बचत होते..लावणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी सुरू होतात तोडे. ते पुढे ६० ते ९० दिवस राहतात.रोजच्या तोड्याला मिळते १०० ते १५० किलोपर्यंत उत्पादन.लागवड ते काढणीपर्यंत एकरी खर्च एक लाख रु.हंगामानुसार प्रति किलो ४० ते ६०, ७० रुपयांपर्यंत दर. पावसाळ्यात कमाल १०० ते १२५ रुपयांपर्यंतही मिळतो दर..शांतिनाथ यांच्या म्हणण्यानुसारयोग्य व्यवस्थापन, नियोजन असेल तर देशी काकडी हे तुलनेने कमी जोखमीचे पीक.एखाद्या वेळी अपेक्षित दर न मिळाल्यास उत्पादन खर्च निघतोच.बाजारपेठेचा अभ्यास आणि हंगामाच्या अचूक नियोजनामुळे कमी कालावधीत चांगले उत्पादन आणि उत्पन्न मिळवून देणारे पीक..भुईमुग, वांग्याची जोडकाकडीला वांग्याची जोड दिली आहे. काकडी खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना त्याची विक्री होते. बाजारात ओल्या भुईमुगाच्या शेंगांची मागणी त्यांनी लक्षात घेतली. तशा प्रकारे लागवड करून शेंगा स्वच्छ धुऊन विक्री होते. एका प्लॉटमध्ये काकडी घेतल्यानंतर तेथे पुन्हा हे पीक घेतले जात नाही. भुईमूग, हरभरा आदींमधून फेरपालट केली जाते..देशी वाणाचे वैशिष्ट्यकाळपट हिरवा रंग.चवीला गोड, कुरकुरीत.बाजारात वर्षभर चांगली मागणी.टिकवणक्षमता चांगली.स्वप्नील पाटील ७०२०४९७३२३.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.