
मी भू-सूक्ष्मजीवशास्त्राचा विद्यार्थी आहे. या शास्त्राने मला खूप नवनवीन गोष्टी शिकवल्या. या गोष्टी शेतकऱ्याला दैनंदिन कामात इतर कोणत्याही विद्याशाखेपेक्षा जास्त मदत करतात. असे असताना हे शास्त्र आजही अंधारात आहे. हे शास्त्र सर्व इंग्रजीत आहे. समजून घेण्यासाठी खूप अवघड आहे. या विषयाची जी पुस्तके उपलब्ध आहेत, ती सर्व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहेत; शेतकऱ्यांसाठी नाहीत. एखादे ५००-६०० पानांचे पुस्तक वाचावे, त्या वेळी दोन-चार सुताचे धागे सापडतात. ‘ॲग्रोवन’सारखे माध्यम मिळाल्यामुळे मला या विषयातील ज्ञानाचे कण मराठीतून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविता आले.
‘सकाळ समूहा’ने १८ वर्षांपूर्वी शेतीसाठी एक स्वतंत्र दैनिक सुरू करण्याचा संकल्प सोडला व तो पुढे प्रत्यक्षात आणला. त्या काळात मी लेखक होण्याच्या मार्गावरील पहिल्या काही इयत्ता उत्तीर्ण झालो होतो. शेतीवर एक १६ पानांचे दैनिक सुरू होतेय, हा एक जसा कौतुकाचा विषय होता, तसा चिंतेचाही होता. दररोज १६ पाने भरून लोकांपुढे आणण्यासाठी इतके साहित्य कसे उपलब्ध होऊ शकेल, हा प्रश्नच होता. परंतु दैनिक सुरू झाले आणि आमची शंका फोल ठरली.
मी पहिल्या दिवसापासून या वृत्तपत्राचा वाचक आहे. या वृत्तपत्रासाठी आपले लेखन स्वीकारले जावे, यासाठी मला पहिले काही महिने उमेदवारी करावी लागली. आमची जमीन १५-२० वर्षे वापरून खराब झाली होती व उत्पादन पहिल्यासारखे मिळत नव्हते. त्यासाठी योग्य सुधारित तंत्राच्या शोधात मी होतो. त्यासाठी विविध ग्रंथांचा अभ्यास करत होतो.
त्या काळात जमिनीची सुपीकता हा फार मोठ्या अभ्यासाचा विषय नव्हता. कृषी विद्यापीठाच्या पातळीवर, एकरी २०-२५ गाड्या शेणखत-कंपोस्ट टाका म्हणजे जमीन सुपीक होईल, या एका वाक्यात सुपीकतेचा विषय संपवून टाकला जात असे. नव्याने सुरू झालेल्या ‘ॲग्रोवन’मध्येही या विषयावर फारसा मजकूर छापून येत नसे. मी तसे तक्रारवजा पत्र पाठवले.
त्यामुळे संपादकांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल, आपली कानउघडणी केली जाईल, असे मला वाटू लागले. आणि एकेदिवशी सकाळीच संपादकांचा फोन आला. दैनिकातील कमतरता दाखवून दिल्याबद्दल त्यांनी चक्क माझे आभार मानले व इथून पुढे सुपीकतेसंबंधीचे लेखन जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. पुढे ते आश्वासन पाळण्याचा त्यांचा प्रयत्न चालू होता. परंतु या विषयातील लेखनच मुळात जास्त उपलब्ध होत नसावे. या गोष्टीला आता १६ वर्षे झाली.
शेतकरी पातळीवर आज याबाबत काय धारणा आहेत, याचा अभ्यास केल्यास शेतकरी उत्पादनवाढीबद्दल जितका विचार करतो, त्यात माझी जमीन सुपीक झाली पाहिजे, हा ध्यास केव्हा सार्वत्रिक होईल, याचे उत्तर आजही सापडणार नाही, असे खेदाने म्हणावे लागते.
एकेदिवशी ॲग्रोवनचे दोन प्रतिनिधी कोल्हापुरात माझ्या घरी आले व शेत पाहण्याची इच्छा व्यक्त केली. आम्ही शेतावर गेलो. तेथे शिवारफेरी व मुलाखत असा दुहेरी कार्यक्रम झाला. माझा अंदाज होता एखाद्या पानावर या मुलाखतीला जागा मिळेल. परंतु पुढे ५ डिसेंबर २००६ पासून पूर्णपान सलग सहा लेखांच्या मालिकेतून या विषयला प्रसिद्धी देण्यात आली.
एखाद्या शेतकऱ्याची इतकी प्रदीर्घ मुलाखत एकमेवच असावी, असा माझा अंदाज आहे. अशा काही प्रसंगांतून संपादकीय सहकाऱ्यांशी दोस्ती वाढत गेली, ती आजतागायत कायम आहे. अनेक कारणांनी माझ्या पुणे भेटी होत, त्यात या दैनिकाच्या कार्यालयाला भेट हा एक कायमचा कार्यक्रम ठरून गेला.
असाच एक दिवस मी कार्यालयात गेलो असता तिथे उपसंपादकांची भेट घेतली. तेथे आणखी काही मंडळी होती. जमिनीच्या सुपीकतेबद्दल प्राथमिक चर्चा चालू होती. उपसंपादकांनी मला एकदम आवाहन केले, की प्रत्येक आठवड्याला अर्धे पान मी तुम्हाला देत आहे; तुम्हीच जमिनीच्या सुपीकतेसंबंधी लिहावे. पूर्ण एक वर्ष एकूण ५२ भाग लेखन करावे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मी कावराबावरा झालो.
एकरी २०-२५ गाड्या शेणखत शेवटच्या कुळवाच्या पाळीआधी देऊन मातीत मिसळले की पूर्वमशागत व जमिनीची सुपीकता एकाच वाक्यात संपून जाई. अशा परिस्थितीत माझ्यासारख्या नवलेखकाने ५२ भाग या विषयावर कसे लिहावे? मी उपसंपादकांना विचार करण्यासाठी काही वेळ मागितला. बरेच चिंतन केल्यावर त्यांना कळवले की ५२ भाग लेखन करणे अवघड आहे, तरीही शक्य तेवढे जास्तीत जास्त लेखन करण्याचा प्रयत्न करून पाहतो, अधेमध्ये विषय संपल्यास मालिका थांबवावी लागेल. त्याला उपसंपादकांनी सहमती दिली व लेखन चालू करण्यास सांगितले. कधी तरी महिना-दोन महिन्यांत एखादा लेख लिहिणारा मी प्रत्येक आठवड्याला एक लेख या आव्हानाला सामोरे जाण्याचे ठरवून कामाला लागलो. तशी लेखमाला लिहिणे हा माझ्यासाठी नवीनच प्रयत्न होता.
धाडस करून लेख लिहीत गेलो. जसजसे लेखन करू लागलो, तससे नवीन विषय सुचत गेले. मालिका लोकप्रिय झाली असावी. त्या काळी आजच्यासारखे दूरध्वनी किंवा मोबाइल नव्हते. वाचकांकडून पत्राद्वारे भरपूर प्रतिक्रिया येत व अनेकांना उलट टपालाद्वारे उत्तरे द्यावी लागत. पाहता पाहता ५२ भाग झाले. मी उपसंपादकांना सांगितले, की आपल्या अपेक्षेप्रमाणे ५२ भाग झाले आहेत; परंतु अजून बराच भाग सांगायचा शिल्लक राहिला आहे, असे वाटते.
मालिका थांबवायची का पुढे चालू ठेवायची? ‘‘तुम्हाला जितके लिहिता येईल, तितका काळ लिहीत राहा, थांबण्याची काही गरज नाही,’’ असा निरोप आला. पुढे मजल दरमजल करत ८० भागांत ती मालिका संपवली. ५२ भाग पुरे करता येतील का, या शंकेने ग्रासलेल्या मला ८० भागांपर्यंत जाता आले, हे आजही स्वप्नवत वाटते. पुढे यथावकाश या लेखांचे संकलन करून ‘सकाळ प्रकाशना’ने त्याचे पुस्तक प्रकाशित केले.
पुण्याच्या सकाळ कार्यालयाच्या प्रवेशद्वारातील काचेच्या कपाटात इतर अनेक प्रथितयश लेखकांच्या पुस्तकांच्या पंगतीत आपले पुस्तक पाहणे हा एक सुखद अनुभव होता. प्रथम आवृत्ती २०११ मध्ये प्रकाशित झाली. २०२२ पर्यंत त्याच्या नऊ आवृत्त्या निघाल्या. आज बारा वर्षांनंतरही त्याच्या खपाचा आलेख चढाच आहे. या लेखमालेने माझ्यातला लेखक घडवला. वर्तमानपत्रातील लेख वेगवेगळ्या विषयांवरील आणि तुटक तुटक असतात. तर पुस्तकातून एकसंघ संपूर्ण विषय अभ्यासता येतो. असे असले तरी मी थेट पुस्तक लिहिण्यास हातात घेतले असते, तर ते पूर्णत्वाला गेले असते की नाही हे सांगता येत नाही. प्रत्येक आठवड्याला चार आखीव कागद लिहिण्याची या दैनिकामुळे पडलेली जबाबदारीच पुस्तकाचे लेखन करण्यास साह्यभूत ठरल्याचे मान्य करावेच लागेल.
(सविस्तर वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.