
हिंगोली येथील रमेश पंडित यांनी डाळनिर्मितीसह बेसन पीठ व धान्यस्वच्छता अशी टप्प्याटप्प्याने व्यवसायवृद्धी केली आहे. उत्पादनांचा पंडित- जी ब्रॅंड लोकप्रिय केला आहे. ‘यशश्री ॲग्रो इंडस्ट्रीज’ या आपल्या उद्योगाची वार्षिक उलाढाल पंधरा वर्षांच्या काळात ७० ते ८० लाख रुपयांपर्यंत पोहोचवली आहे. हिंगोली येथे ‘यशश्री ॲग्रो इंडस्ट्रीज’ या नावाने रमेश पंडित यांनी आपला शेतीमाल प्रक्रिया व्यवसाय नावारूपाला आणला आहे. त्यांचे मूळगाव आखाडा बाळापूर (ता. कळमनुरी) आहे. वाणिज्य शाखेतील पदवीनंतर वृत्तपत्रविद्या व जनसंवाद पदवी अभासक्रम त्यांनी पूर्ण केला. औरंगाबाद व आखाडा-बाळापूर येथे पत्रकारिता केली. परंतु मन रमले नाही. गावी दोन एकर शेती व पीठगिरणी व्यवसाय होता. तेथे डाळनिर्मिती व्हायची. मात्र आठ सदस्य असल्याने कुटुंबाची उपजीविका तेवढ्यावर होणे शक्य नव्हते. मिनी डाळ गिरणीची उभारणी दरम्यान, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने (अकोला) विकसित केलेल्या मिनी डाळमिलविषयी वाचनात आले. त्याद्वारे डाळीचे प्रमाण सर्वाधिक व कोंड्याचे प्रमाण कमी मिळायचे. पंडित यांनी त्याचा वापर करायचे ठरवले. गावी वीज, पाणी या समस्या होत्या. मग हिंगोली येथील महाराष्ट्र राज्य उद्योग विकास महामंडळाच्या वसाहतीत उद्योग सुरू करण्याचे ठरवले. सन २००५ मध्ये पुणे येथील ‘यशदा’ संस्थेत प्रशिक्षण पूर्ण केले. जिल्हा उद्योग केंद्राकडे २००६ मध्ये ‘यशश्री ॲग्रो इंडस्ट्रीज’ नावाने नोंदणी केली. अर्ज केल्यानंतर २००७ मध्ये जवळच्याच लिंबाळा (हिंगोली) येथे १०० बाय ६० चौरस फूट आकाराचा भूखंड मिळाला. आर्थिक नियोजन प्रकल्प अहवालाअंती युनियन बॅंक शाखेने साडेसात लाख रुपये, बीजभांडवल योजनेअंतर्गत जिल्हा उद्योग केंद्राने दीड लाख व स्वतःकडील एक लाख असे १० लाख रुपये भांडवल जमा झाले. अकोला येथून मिनी डाळ मिल खरेदी केली. फेब्रुवारी २००८ मध्ये आई- वडिलांच्या हस्ते उद्घाटन केले. तूर, हरभरा प्रत्येकी १०० क्विंटल डाळ तयार केली. परंतु ‘अनपॉलिश्ड’ डाळीस ग्राहकांची पसंती नव्हती. विक्रीअभावी गोदामात साठा करावा लागला. बेसन पिठाचा पर्याय डाळनिर्मिती सुमारे तीन-चार महिन्यांचाच व्यवसाय होता. वर्षभर व्यवसाय सुरू ठेवण्याच्या दृष्टीने बेसन पीठनिर्मितीचा पर्याय पुढे आला. हॉटेल, खाणावळी आदी ठिकाणी भजी, जिलेबी, विविध पदार्थांसाठी त्यास मागणी असते. हे लक्षात घेऊन हरभराडाळीपासून पीठनिर्मिती करण्याचा निर्णय घेतला. दर्जेदार पिठास व्यावसायिकांकडून मागणी वाढल्यानंतर स्वतंत्र गिरणी घेतली. सुरुवातीला प्रति दिन ३ ते ४ क्विंटल निर्मिती टप्प्याटप्प्याने १० क्विंटलपर्यंत पोहोचली. कोरोना संकटात ती ६ ते ७ क्विंटलपर्यंत आली आहे. व्यवसायातील ठळक बाबी डाळनिर्मिती
बेसन पीठ
धान्य स्वच्छता, प्रतवारी
विक्री व्यवस्था
उलाढाल
उद्योजक घडले पंडित विक्री व्यवस्थापन तर पत्नी त्रिशला निर्मिती प्रक्रिया सांभाळतात. उद्योगात सहा जणांना कायम स्वरूपी रोजगार मिळाला आहे. उत्पन्नातून बॅंकेच्या कर्जाची परतफेड केली आहे. सन २०१० मध्ये लघुउद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पंडित यांना राज्य शासनाचा जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेत परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांत उद्योजक घडले आहेत. जिल्हा उद्योग केंद्रातर्फे विविध प्रशिक्षणांत पंडित मार्गदर्शन करतात. ‘ॲग्रोवन’चे नियमित वाचक पंडित ‘ॲग्रोवन’चे सुरुवातीपासून नियमित वाचक आहेत. त्यातील लेख, पूरक व्यवसाय, बाजारभाव व यशोगाथा त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरल्या आहेत. संपर्क : रमेश पंडित, ९४२१३८८६१०
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.