
कंधार (जि. नांदेड) येथील शिवकुमार मामडे यांचा ज्वेलरी हा मुख्य व्यवसाय. शेती नसली तरी त्याच्या आवडीतून सहा एकर जमीन घेऊन प्रयत्नपूर्वक ती विकसित करण्यास सुरुवात केली. आंब्याच्या २३०० झाडांसह करवंद, नारळ, आवळा, लिंबू, चिंच आदींची समृद्धी जपली. आंब्याची पाच टन थेट विक्रीही केली. व्यवसायातून पैसा मिळतो पण समाधान शेतीतून मिळते ही भावना ठेवून त्यांची वाटचाल सुरू आहे. नांदेड जिल्ह्यात मन्याड खोऱ्यातील कंधार तालुका विविध जाती व चवीच्या आंब्यासाठी परिसरात प्रसिद्ध आहे. येथील गावरान आंब्याला एकेकाळी विविध भागांतून मोठी मागणी असायची. बाचोटीचा आंबा या नावाखाली व्यापारी आजही आंब्याचा व्यवसाय करतात. कंधार येथील शिवकुमार मामडे यांचा ज्वेलरीचा व्यवसाय आहे. त्यातून आर्थिक स्थैर्य मिळवले आहे. त्यांची वडिलोपार्जित शेती नाही. पण आवड होती. व्यवसायातून पैसा मिळतो, पण समाधान शेतीतून मिळते ही श्रद्धा होती. त्यातूनच २०१८ मध्ये कंधारपासून सहा किलोमीटरवरील मौजे संगुचीवाडी येथे सहा एकर जमीन मुख्य रस्त्यालगत खरेदी केली. आता या रस्त्याचे महामार्गात रूपांतर होऊन तो एनएच ५० नावाने ओळखला जातो. फळबाग विकासाला प्राधान्य शिवकुमार यांना शेतीचा पूर्वानुभव काहीच नव्हता. मात्र व्यापारी दृष्टिकोन असल्याने त्याचा उपयोग शेती नियोजनात केला. संपूर्ण क्षेत्रात फळबाग लागवडीचा निर्णय घेतला. जमीन पडीक होती. बाभळीची झाडे वाढली होती. यंत्राच्या साह्याने स्वच्छ करून जमीन लागवडयोग्य केली. आंबा पिकाचा अभ्यास केला. कृषी विभागासह निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. बी. एम. कापसे, विनय वाघदरे यांचे मार्गदर्शन मिळाले. ५० फूट व्यास व ६५ फूट खोलीची विहीर घेतली. एक विंधन विहीर घेतली. पाण्याचा स्रोत बळकट केला. लागवडीसाठी खड्डे खोदण्याऐवजी दक्षिणोत्तर पंधरा फूट अंतरावर एक बाय एक मीटर खोली- रुंदीचे चर घेतले. कीटकनाशक, निंबोळी पेंड, माती, काडीकचऱ्याचा थर, शेणखत, सिंगल सुपर फॉस्फेट, १०:२६:२६, सूक्ष्ममूलद्रव्यांचा वापर केला. त्यावर मातीने चर भरून घेतले. आंबा उत्पादक व तज्ज्ञांशी चर्चा करून सोलापूर येथील नर्सरीतून केसरची, तर लखनौ येथून दशहरी आंब्याची कलमे आणली. खते, डी-कंपोजर, कीडनाशके यांचा गरजेनुसार वापर केला. ठिबक सिंचन व दुहेरी लॅटरल वापरले. विविध वाण व काढणीचे नियोजन आंब्याच्या एकूण २३०० झाडांची लागवड केली. त्यात केसरची १३००, दशहरी एक हजार, मल्लिका २५, आम्रपाली १० असा समावेश होता. योग्य व्यवस्थापनातून तीन वर्षांत बाग फळांवर आली. झाडाची उंची कमी असूनही बाग फळांनी लगडली. चारही बाजूंनी बांबूच्या साह्याने चौकट करून सर्व फांद्यांना आधार दिला. यंदा अक्षय तृतीयेपूर्वी १० दिवस आधी काढणीस सुरुवात केली. संपूर्ण बागेतील काढणी टप्प्याटप्प्याने सुरू केली. दररोज सकाळी चार मजूरांसह शिवकुमार बागेतील प्रत्येक झाडाची पाहणी करायचे. झाडावरच पक्व झालेले पाडाचे व पूर्णतः वाढलेले मोठ्या आकाराचे आंबे तोडायचे. त्यामुळे अन्य फळांची वाढही चांगली होत गेली. प्रतवारीनुसार आंबे वेगवेगळ्या क्रेटमध्ये वर्तमानपत्राचे आच्छादन करून भरले. दशहरीने वाढवली गोडी तजेलदार, रसरशीत, पिवळसर आंबे विक्रीसाठी तयार झाले. ज्वेलरी व्यवसायामुळे ग्राहकांचे नेटवर्क तयार होतेच. व्हॉट्सॲप, फेसबुकच्या माध्यमातूनही ग्राहक थेट बागेतून खरेदी करू लागले. सुरुवातीला प्रति किलो २०० रुपये व त्यानंतर १३५, व १०० रुपये प्रति किलो या दराने एकूण पाच टनांपर्यंत थेट विक्री केली. अजून काही विक्री बाकी आहे. पहिल्यांदाच आलेला आंबा मित्र, पाहुणे, अधिकारी, कर्मचारी यांनाही भेट म्हणून वितरित केला. शिवकुमार म्हणाले, की केसर आंबा तर स्वादाला चांगला आहेच. पण दशहरी देखील कमी पिकलेला असतानाही गोड असतो. त्याचा गर घट्ट व कोय छोटी असते. वरून त्याला चकाकीही असते. त्याचा रसासाठीही चांगला फायदा होतो. फळझाडांची समृद्धी
ठळक बाबी
- शिवकुमार मामडे, ८६६८२६८६७६ (लेखक कंधारचे तालुका कृषी अधिकारी आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.