
Dharashiva News : कळंब तालुक्याच्या काही भागाला वादळी वाऱ्याने झोडपले असून अनेक मोठी झाडे जमीनदोस्त झाली आहेत. तर शेत शिवारातील नागरिकांचे पत्र्याचे शेडही वादळात कोलमडले आहेत. तर येडशी कळंब मार्गही काही काळ बंद ठेवावा लागला आहे.
खामसवाडी, मोहा, मंगरुळ, शेळका धानोरा, खेर्डा, भाटशिरपुरा गावांना बुधवारी (ता. २६) रात्री आलेल्या वादळाने चांगलेच झोडपले आहे.
वाऱ्याचा वेग मोठा असल्याने मोठी झाडे जमीनदोस्त झाली आहेत. यामध्ये आंबा, चिंच, बाभूळ, लिंब अशा झाडांचा समावेश आहे. वाऱ्याचा जोर जास्त असल्याने शेतकऱ्यांनी जनावरांसाठी केलेल्या शेडचे पत्रे उडाले आहेत. खेर्डा (ता. कळंब) येथील शेतकरी रणजित जाधव यांच्या शेडचे पत्रे उडून विहिरीत पडले आहेत.
तर आंब्याची चार मोठी झाडे पूर्णतः आडवी झाली आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे वाऱ्याचा वेग जास्त असल्याने अनेक नागरिकांच्या घरावरील पत्रेही उडाले आहेत.
डीपी कोलमडला, रस्ता बंद
खेर्डा (ता. कळंब) शिवारात सागर शिवाजी जाधव यांचा १५ दिवसांपूर्वी वीजपोल आणि डीपी उभारला होता. मात्र बुधवारी आलेल्या वादळात सर्वच जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे अशा कामांचा दर्जा हीन असल्याचे दिसून येत आहे.
वीज कंपनीचा कारभार यामुळे चव्हाट्यावर आला आहे. येडशी ते कळंब मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यावरच झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक बंद होती. सकाळी नऊ वाजता जीसीबीच्या सहाय्याने झाडे बाजूला हटविण्यात आली.
त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरमयान याबाबात महसूल विभागाने पंचनामे पूर्ण केले असून कृषी विभागाचे पंचनामे होणार असल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली आहे.
धाराशिव शहरात विजेचा लपंडाव
धाराशिव : शहरात गुरुवारी (ता. २७) सकाळपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. अधून -मधून वीज गुल होत असल्यामुळे नागरिकांची चांगलीच डोकेदुखी वाढत आहे. वीज कंपनीने याबाबत पाठपुरावा करून, वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शहरातील नागरिक करीत आहेत.
विजेची समस्या शहरातील नागरिकांना नवीन नाही. बुधवारी सकाळी सात वाजल्यापासूनच शहरात विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. अधून- मधून प्रत्येक दोन तासाला वीज गुल होत आहे.
त्यानंतर १५ ते २० मिनिटांच्या अंतराने पुन्हा वीजपुरवठा सुरळीत होतो. दिवसात असे प्रकार वारंवार होत असल्यामुळे नागरिकांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. संगणकावर काम करणाऱ्या नागरिकांना या लपंडावामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.
संगणक सुरू होताच पुढील पंधरा ते वीस मिनिटात वीज गुल होत असल्यामुळे डोकेदुखी वाढू लागली आहे. कोणत्या कारणासाठी वीज गायब झाली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.