
Pune News : पाकिस्तानकडून येणाऱ्या अतिथंड वाऱ्याच्या प्रवाहांमुळे राज्याच्या किमान तापमानात मोठी घट झाली आहे. पारा घसरल्याने हुडहुडी वाढली असून, मंगळवारी (ता. १०) धुळे येथील कृषी महाविद्यालयात यंदाच्या हंगामातील नीचांकी ४ अंश तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता. ११) राज्यात किमान तापमानात घट होत थंडी आणखी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
पश्चिमी चक्रावात आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका टिकून आहे. मंगळवारी (ता. १०) पंजाबच्या ‘अमृतसर’ येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. मात्र धुळे येथील कृषी विद्यापीठात राज्याचे हंगामातील नीचांकी ४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. तसेच जळगाव, निफाड आणि नाशिक येथे तापमान १० अंशांच्या खाली आले आहे.
मंगळवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३३ अंश तापमानाची नोंद झाली. यातच महाराष्ट्रात गायब झालेली थंडी पुन्हा परतली आहे. स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत असला, तरी दिवसभर वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे उन्हाचा चटका कमी झाला आहे. रात्रीच्या वेळी वाऱ्यांमुळे थंडी अधिक बोचरी ठरत असून, आज (ता. ११) किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मंगळवारी (ता. १०) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३०.१ (१२.३), अहिल्यानगर २८.२ (११.७), धुळे २७ (४), जळगाव २९.४ (८), जेऊर ३३ (१२.५), कोल्हापूर ३१.५ (१९.१), महाबळेश्वर २७.१ (१३.२), मालेगाव २५.४ (१६.८), नाशिक २६.५ (९.४), निफाड २५.९ (८.९), सांगली ३२.७ (१८.१), सातारा ३१.७ (१५.८), सोलापूर ३३ (१९.१), सांताक्रूझ ३१.८ (१८.०), डहाणू २९.१ (१४.१),
रत्नागिरी ३१.८ (१८), छत्रपती संभाजीनगर २९.४ (१२.२), धाराशिव - (१६.३), परभणी ३०.२ (१२.५), परभणी कृषी विद्यापीठ २९.५ (१२.९), अकोला ३०.५ (११.८), अमरावती ३०.२ (१२.३), भंडारा २९.८ (१३), बुलडाणा २५.६ (११.४), ब्रह्मपुरी ३० (१३.८), चंद्रपूर २९.८ (१२.५), गडचिरोली ३० (१३), गोंदिया २९ (१२.२), नागपूर ३०.२ (१२), वर्धा ३०.२ (१२.४), वाशीम ३२.६ (१९.६), यवतमाळ ३१ (-).
धुळ्यात तिसऱ्यांदा नीचांकी तापमान
धुळे येथील कृषी महाविद्यालयात पारा ४ अंशांपर्यंत आल्याने आतापर्यंत तिसऱ्यांदा नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. यापूर्वी २९ डिसेंबर २०१८ मध्ये आतापर्यंतच्या नीचांकी २.४ अंश, तर २७ जानेवारी २०२२ मध्ये २.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर मंगळवारी (ता. १०) पारा ४ अंशांपर्यंत घसरला आहे.
ठळक कमी दाबाचे क्षेत्र किनाऱ्याकडे येतेय
विषुववृत्तीय हिंद महासागर आणि आग्नेय बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाब क्षेत्र मंगळवारी ठळक झाले आहे. ही प्रणाली आज (ता. ११) तमिळनाडू आणि श्रीलंकेच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
१० अंशांपेक्षा कमी तापमान असलेली ठिकाणे :
धुळे (कृषी) ४, जळगाव ८, निफाड ८.९, नाशिक ९.४.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.