
डॉ. रामचंद्र साबळे
Weather News : महाराष्ट्रावर आजपासून मंगळवारपर्यंत (ता.१६ ते १८) हवेचे दाब १०१० हेप्टापास्कल इतके राहतील. म्हणजेच सध्या असलेली हवामान स्थिती कायम राहील. मात्र बुधवारी (ता.१९) हवेचे दाब १००८ हेप्टापास्कल इतके होताच, तापमानात २ अंश सेल्सिअसने वाढेल. गुरुवारी (ता.२०) महाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतके हवेचे दाब राहतील. त्या वेळी तापमानात घसरण होईल. तसेच शुक्रवारी व शनिवारी (ता.२१, २२) महाराष्ट्रावर हवेचे दाब १०१२ हेप्टापास्कल इतके होताच, पुन्हा तापमानात घसरण होईल. अशा प्रकारे तापमानात चढ-उतार जाणवतील.
ज्या ठिकाणी हवेचे दाब कमी होतील, तेथे शनिवारपर्यंत (ता.२२) हवामान ढगाळ राहणे शक्य आहे. मात्र सध्यातरी पावसाची शक्यता दिसून येत नाही. कमाल तापमान कोकणातील काही भागांत ३७ अंश सेल्सिअसपर्यंत, तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत ३८ ते ३९ अंश सेल्सिअसपर्यंत, तर विदर्भातही तापमानाचा पारा ३८ ते ३९ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातही ३९ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत तापमानात वाढ शक्य आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच भागात दुपारी उष्णतेच्या लाटा जाणवतील. विशेषतः विदर्भात प्रकर्षाने जाणवतील. दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत मोठी घट होऊन दुपारी हवामान उष्ण व कोरडे राहील. वाऱ्याच्या दिशेत वारंवार बदल होण्याची शक्यता आहे.
सध्या अरबी समुद्र व हिंदी महासागराच्या भागात ढग जमा होत आहेत. मात्र सध्यातरी त्यांचा प्रभाव दक्षिणेकडील केरळ व जवळच्या भागावर अधिक राहणार असल्याचे दिसून येत आहे. प्रशांत महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान २२ अंश सेल्सिअस, तर इक्वॅडोरजवळ २६ अंश सेल्सिअस राहील. हिंदी महासागराच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. तसेच अरबी समुद्राच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमानही ३० अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढून ढग निर्मिती होईल.
कोकण ः
कमाल तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान पालघर जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता राहील. किमान तापमान ठाणे जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअसपर्यंत राहील. मात्र रत्नागिरी, रायगड व पालघर जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस आणि रायगड जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग, रायगड व पालघर जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. मात्र रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ठाणे जिल्ह्यात ५७ टक्के, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व पालघर जिल्ह्यांत ७० ते ७८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ठाणे जिल्ह्यात ४३ टक्के, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ५० ते ५८ टक्के आणि रायगड जिल्ह्यात ६१ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत ३ ते ६ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील.
उत्तर महाराष्ट्र ः
कमाल तापमान नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांत ३६ अंश सेल्सिअस, तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. किमान तापमान धुळे जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस, तर नाशिक जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता धुळे जिल्ह्यात ४२ टक्के आणि नंदुरबार जिल्ह्यात ६० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यात २० ते २७ टक्के इतकी कमी राहील. हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.
मराठवाडा ः
कमाल तापमान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस, धाराशिव, लातूर, बीड व जालना जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस राहील. हिंगोली जिल्ह्यात कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस, तर नांदेड व परभणी जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस, धाराशिव, लातूर, परभणी व जालना जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. हिंगोली जिल्ह्यात किमान तापमान २५ अंश सेल्सिअस, तर नांदेड जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहणे शक्य आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४१ टक्के, तर परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ४५ टक्के राहील. लातूर, नांदेड, बीड या जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५१ ते ५६ टक्के, तर धाराशिव जिल्ह्यात ६३ टक्के राहील. नांदेड, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता २५ ते २६ टक्के, तर लातूर व बीड जिल्ह्यांत ३० ते ३४ टक्के व धाराशिव जिल्ह्यात ३७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १३ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.
पश्चिम विदर्भ ः
कमाल तापमान अमरावती जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस, तर बुलडाणा जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस राहील. अकोला व वाशीम जिल्ह्यांत कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बुलडाणा जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस, तर अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ४० ते ४५ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता २० ते २५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १० कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.
मध्य विदर्भ ः
कमाल तापमान यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस, तर वर्धा जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान वर्धा जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस, यवतमाळ जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस आणि नागपूर जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नागपूर जिल्ह्यात ३७ टक्के, तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत ४५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यात १० ते ११ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.
पूर्व विदर्भ ः
कमाल तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गोंदिया जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस, तर भंडारा जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत २७ ते २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ४० टक्के, चंद्रपूर जिल्ह्यात ५५ टक्के आणि गडचिरोली जिल्ह्यात ६० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २५ टक्के, तर गडचिरोली जिल्ह्यात ३० टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान उष्ण व कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत १० ते ११ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत वायव्येकडून राहील.
पश्चिम महाराष्ट्र ः
कमाल तापमान अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस, तर कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान पुणे जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस, अहिल्यानगर, सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस आणि सोलापूर जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता पुणे जिल्ह्यात ४८ टक्के, अहिल्यानगर जिल्ह्यात ५२ टक्के राहील. मात्र सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता अहिल्यानगर जिल्ह्यात २६ टक्के, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत ३३ ते ३५ टक्के इतकी कमी राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १० कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.
कृषी सल्ला ः
- रब्बी ज्वारीचे पीक परिपक्व झाले असल्यास काढणी व मळणी करावी.
- फळबागांमध्ये गवताचे आच्छादन करावे.
- नवीन लागवड केलेल्या नारळ रोपांना छोटा मंडप करून सावली करावी.
- जनावरांना दिवसातून ३ ते ४ वेळा थंड पाणी पिण्यास द्यावे.
- कुक्कुटपालन शेडमध्ये पिण्याच्या पाण्याची भांडी वाढवावीत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.