Maharashtra Rain Forecast : ऑगस्टमध्ये कमजोर, सप्टेंबरमध्ये वाढणार जोर
Pune News : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामामध्ये दुसऱ्या टप्प्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाचे संकेत आहेत. ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत १०६ टक्क्यांहून अधिक पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) गुरुवारी (ता. ३१) जाहीर केला. ऑगस्ट महिन्यात देशात सरासरी (९४ ते १०६ टक्के) पावसाचा अंदाज आहे. ऑगस्टमध्ये कमी तर सप्टेंबर महिन्यात अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा यांनी मॉन्सून हंगामाचा दुसऱ्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. १९७१ ते २०२० कालावधीत देशातील मॉन्सून पावसाची आकडेवारी पाहता, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरी ४२२.८ मिलिमीटर पाऊस पडतो. मॉन्सूनच्या अखेरच्या टप्प्यातील दोन्ही महिन्यांत देशात १०६ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे.
पूर्वोत्तर राज्ये, पूर्व भारत, लडाख, मध्य भारत आणि पश्चिम किनारपट्टीवरील तुरळक भाग वगळता देशात सर्वदूर सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
एल-निनो तटस्थ, आयओडी ऋण
विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्र पृष्ठभागात सध्या एल-निनो तटस्थ स्थितीत आहे. मॉन्सून हंगामात अखेरच्या टप्प्यात ही स्थिती कायम राहणार असून, वर्षाच्या अखेरील ‘ला-निना’ स्थिती तयार होण्याचे संकेत आहेत. तर हिंद महासागरात इंडियन ओशन डायपोल (आयओडी) तटस्थ स्थितीत असून, उर्वरित मॉन्सून हंगामात आयओडी ऋण (निगेटिव्ह) होण्याचे संकेत आहेत.
ऑगस्टमध्ये पाऊस गाठणार सरासरी
ऑगस्टमध्ये मॉन्सूनचा पाऊस काहीशी उघडीप देण्याची शक्यता आहे. मात्र देशात सरासरीइतका ९४ ते १०६ टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. १९७१ ते २०२० कालावधीत ऑगस्टची पावसाची दीर्धकालीन सरासरी २५४.९ मिलिमीटर आहे.
ऑगस्टमध्ये मध्य भारत, पश्चिम किनारपट्टी, पूर्व आणि पूर्वोत्तर राज्यांच्या काही भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. मध्य भारताचा दक्षिण भाग, पूर्व भारत आणि वायव्य भारताच्या उत्तर भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक आहे.
महाराष्ट्रासाठी ऑगस्ट चिंता वाढवणारा
जुलै महिन्यात सरासरी गाठणारा मॉन्सून ऑगस्टमध्ये उसंत घेण्याची शक्यता आहे. पहिल्या दोन आठवड्यात पावसाची दडी राहण्याची शक्यता असल्याने, तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा काही भाग वगळता उर्वरित राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता असल्याने ऑगस्ट महिना चिंता वाढविणारा ठरण्याचे संकेत आहेत.
ऑगस्टच्या शेवटच्या दोन आठवड्यात पाऊस वाढणार असून, सप्टेंबर महिन्यात राज्यात पावसाचे पुनरागमन होण्याचे संकेत आहेत. ऑगस्टमध्ये कमाल तापमान सरासरी इतके, तर किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.
तालुकानिहाय पाऊस निरीक्षण योजना
हवामान विभागातर्फे देशातील प्रत्येक तालुक्यात पडणाऱ्या पावसाचे निरीक्षण करण्याची योजना (ब्लॉकवाईज रेनफॉल मॉनिटरिंग सिस्टीम - बीआरएमएस) सुरू करण्यात आली आहे. ही एक स्वदेशी पद्धतीने विकसित केलेली प्रणाली असून, याद्वारे संपूर्ण भारतातील ७२०० तालुक्यांसाठी वास्तविक वेळेत पावसाची महिती उपलब्ध होणार आहे. या प्रणालीमुळे माहितीच्या अचुकतेत वाढ होणार असून, पावसाच्या आकडेवारीची सुस्पष्टता आणि उपयुक्तता देखील वाढणार असल्याचे डॉ. मोहपात्रा यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.