
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रावर आज आणि उद्या (ता. २०, २१) हवेचे दाब १००६ हेप्टापास्कल इतके कमी राहतील. त्यामुळे हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार (ता.२२ ते २५)पर्यंत हवेच्या दाबात वाढ होऊन ते १००८ हेप्टापास्कल इतके राहतील. या हवेचे दाबाचा परिणाम ढगाळ हवामानावर होईल. पश्चिम विदर्भात वाऱ्याच्या ताशी वेगात वाढ होईल. वारे ताशी २१ ते २५ किमी वेगाने वाहतील. दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत घट होईल. त्यामुळे दुपारी हवामान उष्ण व कोरडे राहील.
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व विदर्भात किमान तापमानात वाढ होईल. विदर्भात किमान तापमान २९ ते ३० अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. त्यामुळे सकाळी देखील उष्ण हवामान जाणवण्यास सुरुवात होईल. एप्रिल हा महिना सर्वांत जास्त उष्ण असतो. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत उष्णतेचे प्रमाण वाढतच राहील. मराठवाडा व विदर्भात किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. मराठवाड्यात कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल.
भारतीय हवामान शास्त्र विभागाने लांब पल्ल्याच्या जून ते सप्टेंबर महिन्यासाठी नुकताच पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. भारतातील सरासरीच्या १०५ टक्के पाऊस होईल, असा दिलासादायक अंदाज देण्यात आला आहे. तसेच स्कायमेटने या वर्षी सरासरीच्या १०३ टक्के पावसाचा अंदाज जून ते सप्टेंबर या कालावधीसाठी दिला आहे.
जून महिन्याचे सरासरीपेक्षा कमी, जुलै महिन्याचे सरासरीच्या १०२ टक्के, ऑगस्ट महिन्याचे सरासरीच्या १०८ टक्के, तर सप्टेंबर महिन्याचे सरासरीच्या १०४ टक्के पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. या अंदाजामध्ये ५ टक्के अधिक किंवा ५ टक्के कमी पाऊस होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाचा ८७० मिमी, तर स्कायमेटचा ८६८ मिमी पावसाचा अंदाज आहे. यावरून आगामी पावसाळा चांगला राहील असे दिसते.
पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान प्रशांत महासागराच्या पेरूजवळ १८ अंश सेल्सिअस, तर इक्वॅडोरजवळच्या विषुववृत्तीय भागात २५ अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे सध्या ‘ला-निना’चा प्रभाव सुरू असून, यापुढील काळात पूर्वमोसमी पावसाची शक्यता राहील.
कोकण ः
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व पालघर जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस, तर ठाणे जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. किमान तापमान सिंधुदुर्ग, रायगड व पालघर जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६७ टक्के, तर रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ७२ ते ७६ टक्के राहील.
दुपारची सापेक्ष आर्द्रता रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३० टक्के, तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ४३ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग २ ते ५ किमी राहील. वाऱ्याची दिशा सिंधुदुर्ग जिल्ह्यात वायव्येकडून, रत्नागिरी जिल्ह्यात ईशान्येकडून, तर रायगड व पालघर जिल्ह्यांत आग्नेयेकडून राहील. ठाणे जिल्ह्यात वाऱ्याची दिशा पूर्वेकडून राहील.
उत्तर महाराष्ट्र ः
कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस, तर नंदूरबार जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस राहील. धुळे व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस, तर जळगाव जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील.
नाशिक व जळगाव जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नाशिक, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ५० टक्के, तर धुळे जिल्ह्यात ५९ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता २५ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग धुळे जिल्ह्यात १६ किमी, तर उर्वरित जिल्ह्यात ताशी १० ते १३ किमी राहील. वाऱ्याची दिशा नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून, तर जळगाव जिल्ह्यात वायव्येकडून राहील.
मराठवाडा ः
कमाल तापमान नांदेड व परभणी जिल्ह्यांत ४४ अंश सेल्सिअसपर्यंत, तर हिंगोली जिल्ह्यात ४३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस, तर लातूर व जालना जिल्ह्यांत ४१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धाराशिव जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस, तर लातूर, नांदेड, बीड, परभणी, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. हिंगोली जिल्ह्यात किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील.
सकाळची सापेक्ष आर्द्रता धाराशिव, लातूर व बीड जिल्ह्यांत ५४ टक्के, तर परभणी व जालना जिल्ह्यांत ४० टक्के राहील. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ३७ टक्के, तर नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत २८ ते २९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता नांदेड, बीड, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत २५ टक्के, तर धाराशिव जिल्ह्यात ३० टक्के राहील. धाराशिव, बीड, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १३ ते १६ किमी, तर लातूर व नांदेड जिल्ह्यांत ८ किमी राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.
पश्चिम विदर्भ ः
कमाल तापमान बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांत ४१ अंश सेल्सिअस, तर अकोला व वाशीम जिल्ह्यांत ४२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बुलडाणा जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, वाशीम जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस, तर अकोला व अमरावती जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील.
सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ३५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता अकोला व अमरावती जिल्ह्यांत १८ टक्के, तर वाशीम व बुलडाणा जिल्ह्यांत २२ ते २४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यात २१ ते २५ किमी राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.
मध्य विदर्भ ः
कमाल तापमान नागपूर जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस, वर्धा जिल्ह्यात ४२ अंश सेल्सिअस आणि यवतमाळ जिल्ह्यात ४३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील. आकाश सर्वच जिल्ह्यात अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता वर्धा जिल्ह्यात ४२ टक्के, नागपूर जिल्ह्यात ३८ टक्के व यवतमाळ जिल्ह्यात २९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता यवतमाळ जिल्ह्यात १८ टक्के, नागपूर जिल्ह्यात २० टक्के आणि वर्धा जिल्ह्यात २३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत १४ किमी राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने नैर्ऋत्येकडून राहील.
पूर्व विदर्भ ः
गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर जिल्ह्यात ४२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गोंदिया जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस, भंडारा जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील.
सकाळची सापेक्ष आर्द्रता गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत ४० ते ४२ टक्के, तर चंद्रपूर जिल्ह्यात २६ टक्के इतकी कमी राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता भंडारा जिल्ह्यात १७ टक्के, तर गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांत २० टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत ९ किमी, तर गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत ताशी १२ किमी राहील. वाऱ्याची दिशा चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यांत वायव्येकडून, तर गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून राहील.
पश्चिम महाराष्ट्र ः
कमाल तापमान कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअस, तर सातारा, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअस राहील. सोलापूर जिल्ह्यात कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस राहील.
किमान तापमान सोलापूर जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस, तर कोल्हापूर जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस राहील. सांगली, सातारा व अहिल्यानगर जिल्ह्यांत कमाल तापमान २१ अंश सेल्सिअस आणि पुणे जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ७१ टक्के, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत ६३ टक्के, तर सांगली व पुणे जिल्ह्यांत ५९ टक्के आणि अहिल्यानगर जिल्ह्यात ५४ टक्के राहील.
दुपारची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ३५ टक्के, पुणे जिल्ह्यात ३० टक्के, तर उर्वरित जिल्ह्यांत २५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग सोलापूर जिल्ह्यात १६ किमी, तर उर्वरित जिल्ह्यांत ताशी १० ते १३ किमी राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने नैर्ऋत्येकडून व वायव्येकडून राहील.
कृषी सल्ला ः
- द्राक्षाची एप्रिल छाटणी लवकरात लवकर पूर्ण करावी.
- नारळाच्या लहान रोपांना सावली करावी.
- बाष्पीभवनाचा वेग कमी करण्यासाठी फळझाडांवर केओलीन द्रावणाची फवारणी करावी.
- तापमानात वाढ शक्य असल्याने शेती कामे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करावीत.
- उन्हाळी पिकांमध्ये सिंचनाचे काटेकोर नियोजन करावे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.