
Pune News : गेल्या काही वर्षांपासून मॉन्सूनमध्ये वेगाने बदल होत आहे. त्यामुळे हवामानाचा अचूक अंदाज देणे ही जागतिक स्तरावरील मोठी अडचण ठरत आहे. त्यावर अधिक चर्चा, संशोधन होण्याची गरज आहे. त्यासाठी जागतिक स्तरावरील हवामान तज्ज्ञांची बैठक महत्त्वाची असून या बैठकीत संशोधन अहवालावर चर्चा करून उपयुक्त माहिती पुढे येण्याची आवश्यकता आहे, असे मत ऑनलाइन पद्धतीने सहभागी झालेले पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन यांनी व्यक्त केले
भारतीय हवामान विभाग (आयएमडी) आणि भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम) या संस्थांच्या वतीने ‘मॉन्सूनच्या अंदाजामध्ये झालेली प्रगती आणि त्याचे बदलत्या हवामानावर झालेले परिणाम’ या विषयावर पाच दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळा संस्थेच्या मेघदूत सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेचे उद्घाटन ‘आयआयटीएम’चे संचालक डॉ. आर. कृष्णन यांच्या हस्ते सोमवारी (ता. १७) झाले. त्यावेळी श्री. रविचंद्रन बोलत होते. या प्रसंगी जागतिक वातावरण संशोधन कार्यक्रमाचे वैज्ञानिक डॉ. निको कॅल्टोबियनो, जागतिक हवामान संशोधन कार्यक्रमाचे वैज्ञानिक हिंदुमती पलानीसामी आदी उपस्थित होते. या कार्यशाळेत जगभरातील ३०० हून अधिक शास्त्रज्ञ, विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
‘आयएमडी’चे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा म्हणाले, की भारतीय हवामान संस्था ही सर्वात जुनी संस्था आहे. या संस्थेमार्फत देशातील हवामानाचा अंदाज दिला जात आहे. त्यासाठीचे संशोधन हे भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेमध्ये केले जात आहे.
याशिवाय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत देशभरात हवामान बदलावर संशोधन करणाऱ्या इतर संस्थाही काम करत आहे. त्यामुळे या संस्थेमार्फत दिला जाणारा हवामानाचा अंदाज जागतिक स्तरासाठी महत्त्वाचा ठरत आहे. परंतु अजूनही हवामानाचा अचूक अंदाज वर्तविण्यासाठी काम करण्याची गरज आहे. त्यासाठी जगभरातील सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची आवश्यक आहे.
‘आयआयटीएम’चे संचालक डॉ. आर. कृष्णन म्हणाले, की मागील काही वर्षांपासून हवेत कार्बनडाय ऑक्साइड आणि मिथेन वायूचे प्रमाण वाढत असल्याने तापमानात वाढ होत आहे. त्याचा परिणाम पावसाच्या कमी जास्त प्रमाणावर होत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये या प्रमाणात अधिक वाढ होण्याची शक्यता असून कमी वेळात जास्त पाऊस पडणे, गारपीट, ढगफुटीसारख्या घटनांमध्ये अधिक वाढ होईल.
याचबरोबर येत्या काळात तापमानात आणखी वाढ झाल्यास या पावसाच्या प्रमाणात अधिक वाढ होईल. त्यामुळे पावसाचे प्रमाण हे कमी जास्त राहणार असून ओला आणि कोरड्या दुष्काळ सदृश्य जागतिक परिस्थितीला सामोरे जावे लागेल. यावरही अधिक अभ्यास होण्याची गरज आहे. कार्यशाळेत जागतिक मॉन्सून प्रकल्पाचे कार्यकारी संचालक डॉ. ई. राजागोपाल यांनी प्रास्ताविक आणि आभार मानले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.