
Nashik Weather News : मार्च महिन्यात वादळी वाऱ्यासह झालेला पाऊस व गारपिटीने (Hailstorm) शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीत आणले आहे. यामुळे अनेक ठिकाणी गहू आडवा झाला, तर द्राक्ष मण्यांना तडे जाऊन मोठे नुकसान झाले आहे.
लेट खरीप व उन्हाळी कांदा, कांदा डेंगळे यांसह भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला आहे. हे संकट ताजे असतानाच पुन्हा जिल्ह्याच्या विविध भागांत ढगाळ वातावरण, वारे तसेच हलक्या सरी झाल्याने शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे.
गुरुवारी (ता. ३०) कळवण, मालेगाव तालुक्यांत काही ठिकाणी हलक्या सरी बरसल्या. त्यामुळे मध्यरात्री अनेक शेतकऱ्यांची कांदा कापणी करून शेतात पडलेले पीक झाकण्यासाठी एकच तारांबळ उडाली होती.
जिल्ह्यात अनेक भागांत ढगाळ वातावरण तयार होऊन वारा वाहत असल्याने शेतकऱ्यांची धावपळ झाली आहे. अनेक भागांत गहू कापणी, लेट खरीप व उन्हाळ कांदा काढणी याशिवाय द्राक्ष खुडे सुरू आहे. त्यातच पुन्हा वातावरण अचानक बदलल्याने शेतकऱ्यांना धडकी भरली आहे.
चांदवड तालुक्यात ढगाळ वातावरण असून आडगाव टप्पा, दरेगाव परिसरात हलका पाऊस झाला. येथे वेगाने वारे वाहत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
निफाड तालुक्यातील ओझर परिसरात सकाळी सहा वाजता हलका पाऊस झाला. निफाड, नांदगाव, चांदवड, दिंडोरी, नाशिक तालुक्यांत ढगाळ वातावरण असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
पेठ तालुक्यात पिकांना फटका
पेठ तालुक्यातील करंजाळी परिसरात अर्धा तास मध्यम ते हलक्या सरी बरसल्या. त्यामुळे कापणी करून शेतात पडलेले गहू पीक पावसात भिजल्याने नुकसान होईल, असे शेतकरी यशवंत गावंडे यांनी सांगितले. याशिवाय बदलत्या वातावरणाचा आगामी आंबा उत्पादनावर परिणाम होणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.