Satara Rain Update : जिल्ह्याच्या अनेक भागांना विजेच्या कडकडाटसह वादळी पावसाने झोडपून काढले. वाई, खंडाळा, कराड, पाटण, कोरेगाव, महाबळेश्वर, सातारा या तालुक्यांत पाऊस झाला.
रब्बी पिकांची काढणी सुरू असून, पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. ऊस गळीत हंगामही अंतिम टप्प्यात आला असून, पावसामुळे ऊसतोडही खोळंबणार आहे.
बुधवारी (ता. १५) सायकांळी ढगांचा गडगडाट, विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसास सुरुवात झाली.
खंडाळा व शिरवळ परिसरात अवकाळी पावसामुळे पिकांचे व फळबागांचे नुकसान झाले असून रब्बी पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. यामध्ये ज्वारी, गहू, स्ट्रॉबेरी, टोमॅटो, केळी, पपई व इतर पालेभाज्यांचे समावेश आहे.
वादळामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. फलटण तालुक्यात अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस झाला. जावली येथे कडब्याच्या गंजीवर वीज पडल्याने गंज जळाली आहे. वाई, खंडाळा, कराड, पाटण, कोरेगाव, महाबळेश्वर, सातारा तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक होते.
दांडेघर येथे वीज पडून दोन म्हशी ठार
दांडेघर (ता. महाबळेश्वर) येथे वीज पडून दोन म्हशी ठार झाल्या. यात सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की दांडेघर येथील शेतकरी बाळू महादेव राजपुरे यांच्या दोन म्हशी टेबललँड या परिसरात चरायला गेल्या होत्या.
बुधवारी (ता. १५) सायंकाळी पाचच्या सुमारास या परिसरात विजांचा कडकडाट झाला. या दोन म्हशींच्या अंगावर वीज कोसळली आणि त्यात म्हशी जागीच ठार झाल्याची घटना घडली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.