
Cyclone Biporjoy News : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपॉरजॉय चक्रीवादळाने काल(ता.१६) गुजरातमध्ये आगमन करताच हाहाकार माजवण्यास सुरूवात केली आहे. या चक्रीवादळाने गुजरातच्या सौराष्ट्र-कच्छ भागात रौद्ररूप धारण केले.
ताशी १२५ किमी वाऱ्याचा वेग असल्याने अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले. दरम्यान कच्छमधील घरांच्या पडझडीसह दोघांचा मृत्यू झाला तर २३ जण जखमी झालेत. तसेच पिकांसह अनेक जनावरे वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
सध्या बिपॉरजॉय चक्रीवादळ सौराष्ट्र-कच्छ प्रदेशातून आज (ता.१६) राजस्थानमध्ये सरकण्याची शक्यता आहे. यामुळे राजस्थानमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली. हे वादळ राजस्थानच्या दिशेने जात असताना त्याची तीव्रता कमी होईल असे हवामान विभागाकडून माहिती देण्यात आली.
वादळाचा सर्वात मोठा फटका गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्र या भागाला बसला आहे. जोरदार वाऱ्यामुळे हजारो झाडे उन्मळून पडली आहेत तर काही ठिकाणी मोबाईल टॉवर, वीज आणि ट्रान्समिशनचे खांब कोसळले आहे. तसेच २४ जनावरांचा मृत्यू झाला आहे.
गुजरातमधील भावनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये एका नाल्याला आलेल्या पुरात अडकलेल्या शेळ्यांना वाचवताना पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याची माहिती एनडीआरएफकडून देण्यात आली.
याचबरोबर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी चक्रीवादळाचा फटका बसलेल्या सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना नुकसानीचा प्राथमिक अंदाज घेण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.
ताशी १२५ किमी वेगाने वाहणाऱ्या वादळाचा हाहाकार
कच्छ, पोरबंदर, द्वारका, जामनगर, मोरबी, राजकोट, जुनागड, वलसाड या गुजरातच्या भागासह लगतच्या दमण दीवलाही या वादळाचा जोरदार फटका बसला. रात्री ९ च्या सुमारास जखाऊ बंदरानजीक चक्रीवादळ धडकले आणि त्याचा जमिनीवरील प्रवास सुरू झाला.
१२५ कि.मी. प्रतितास वेगाने वारे वाहू लागल्याने वातावरणात भयकारी स्थिती निर्माण झाली. या वादळाची तीव्रता कमी होत उत्तरेकडे राजस्थानपर्यंत पोहोचणार असून वादळाच्या मार्गावर सर्वत्र जोरदार वारे आणि पाऊस सुरू झाला आहे.
१ लाख लोकांचे केले स्थलांतर
बिपॉरजॉयची तीव्रता पाहून एनडीआरएफच्या जवानांनी ज्या भागात तीव्रता आहे त्या भागातील १ लाख लोकांना स्थलांतरीत केले आहे. एकट्या कच्छ जिल्ह्यातील ४६ हजार ८०० जणांना हलवण्यात आले आहे. यामध्ये त्यात १० हजार लहान बालकांचा समावेश आहे. तर १ हजार २०० गरोदर महिला आणि ६ हजार वृद्धांचा समावेश आहे.
याशिवाय कच्छ, पोरबंदर, द्वारका, जामनगर, मोरबी, राजकोट, जुनागड, वलसाड येथे एकूण १५५० मदत केंद्रे उभारण्यात आली असून तेथे या सर्वांना निवारा देण्यात आला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.