Agriculture Technology: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाने (राजहंस) शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान व सुविधा पुरवून दूध उत्पादन वाढीस मोठी चालना दिली आहे. पंजाबच्या धर्तीवर प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात पन्नास लिटर दूध देणारी गाय असावी यासाठी ‘मिशन पन्नास लिटर’ आणि त्या गाईपासून मिळणाऱ्या कालवडीसाठी कालवड संगोपन योजना सुरू केली आहे. त्याला शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. .अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात अनेक गावे दुष्काळी आहेत. अशा गावांतील दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पन्नास वर्षांपूर्वी ज्येष्ठ स्वतंत्रसेनानी, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी संगमनेर तालुका दूध उत्पादक व प्रक्रिया संघाची (राजहंस) स्थापना केली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संघाचा विस्तार केला. सतरा, अठरा वर्षांपासून रणजितसिंह देशमुख यांच्याकडे आता जबाबदारी असून, ते अध्यक्ष तर डॉ. सुजित खिलारी कार्यकारी संचालक आहेत. .संघ स्थापन झाला त्या वेळी संगमनेर तालुक्यात अत्यंत कमी दूध संकलन होते. संघाने नवनव्या तांत्रिक बाबींना चालना देत दूध उत्पादन वाढीसाठी कार्य केले. आजमितीला तालुक्यात सुमारे २० हजारांच्या जवळपास दूध उत्पादक तर दररोज ८ ते ९ लाख लिटरच्या आसपास दुधाचे उत्पादन होत असावे असा अंदाज आहे. केवळ संगमनेर तालुका दूध संघाकडे चार लाख लिटरपर्यंत दूध संकलन होते. देशमुख यांच्या संकल्पनेतून ‘मिशन पन्नास लिटर’ हा राज्यातील पहिला उपक्रम चांगलाच चर्चेत आला आहे..Dairy Farming Technology: पशुसंवर्धनातील यांत्रिकीकरण.मॉडर्न डेअरी फार्म योजनासंघाने शास्त्रीय व व्यावसायिक पद्धतीने ‘मॉडर्न डेअरी फार्मची संकल्पना पुढे आणली. त्यासाठी तालुक्यातील सुमारे शंभर तरुण दुग्धोत्पादकांच्या गोठ्यांची निवड केली. त्यांना मॉडर्न डेअरी फार्म कसा असावा याबाबत ‘डिझाइन’ दिले. मोकळी हवा राहण्यासाठी गोठ्याची उंची, दुभत्या, गाभण गाई तसेच वासरे यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, चोवीस तास पाणी, वीस गाईंची संख्या निश्चित करून त्यासाठी गोठ्याचे आकारमान, प्रति गाईला किती जागा असावी? .गोठ्यातील तापमान नियंत्रित कसे करता येईल आदी तांत्रिक बाबीं गोठ्यात आणल्या. दररोज शेणाची उचल थांबली. या संकल्पनेमुळे मुक्तसंचार गोठ्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. आज तालुक्यात जवळपास १८ हजारांपेक्षा अधिक शेतकरी याच पद्धतीचा वापर करतात. त्यातून हजारो गाई दोरखंडातून मुक्त केल्याचा आनंद असल्याचे देशमुख सांगतात. या गोठ्यामुळे शेतकऱ्यांचे कष्ट कमी झाले. गाईंची हालचाल वाढली. त्यांना मनसोक्त पाणी मिळू लागले..मुरघास तंत्रज्ञान सुमारे पंधरा वर्षांपूर्वी तालुक्यात मुक्तसंचार गोठा, मुरघास तयार करण्याची संकल्पना संघाने सुरू केली. पाणीटंचाईच्या काळात चाराटंचाईवर मात करणे त्यामुळे शक्य झाले. मुरघासाची ही संकल्पना सर्वप्रथम संगमनेर तालुक्यातून सुरू झाली असे सांगण्यात येते. मुरघासासाठी लागणाऱ्या पिशव्या, मक्याचे सुधारित बियाणे यांचा अनुदानावर पुरवठा केला. आवश्यक कुट्टी यंत्र टर्की देशातून मागवून ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले. त्यातून होणारे फायदे पाहून परिसरातील अन्य शेतकरीही मुरघास निर्मिती तंत्राकडे वळले. आज ९० टक्क्यांहून अधिक शेतकरी मुरघास निर्मिती करीत आहेत. अनेकांकडे स्वतःची कुट्टी यंत्रे आहेत. दूध काढणीसाठी यंत्राचा वापर करण्यासाठी संघाकडून आर्थिक निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. .आरोग्य तपासणी सुविधागाय आजारी पडली, तर आजाराबाबत निदान करण्यासाठी ‘आरटीपीसीआर’ची सुविधा संघाने उपलब्ध केली आहे. यात स्तनदाह व रक्तातील परजीवी यांची तपासणी करून चार तासात संघाच्या प्रयोगशाळेद्वारे अहवाल देण्यात येतो. पशुवैद्यक अभ्यासक डॉ. अब्दुल समद यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे. संघाचे पशुवैद्यक अधिकारी डॉ. विजय कवडे म्हणाले, की गाईच्या आरोग्याच्या अनुषंगाने विविध तपासण्या अल्प दरात करून दिल्या जातात. शेतकरी नमुना आणून देतात. तपासणीतून जलद निदान होत असल्याने शेतकऱ्यांचा खर्च, वेळ यात बचत तर नुकसान टाळता येत आहे..IoT Technology: उन्हाळ्यात गोठा थंड ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान: आयओटी सेन्सर्स .‘मिशन पन्नास लिटर’ उपक्रमसंघाने (राजहंस) दोन वर्षांपासून पंजाबच्या धर्तीवर दररोज पन्नास लिटर दूध देणारी गाय असावी यासाठी ‘मिशन पन्नास लिटर’ आणि त्या गाईंपासून मिळणाऱ्या कालवडीसाठी कालवड संगोपन योजना सुरू केली आहे. बहुतांश गाई एचएफ व काही जर्सी आहेत. आयात केलेले (इंपोर्टेड) तसेच सॉर्टेड सीमेन या पैदास तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. संघामार्फत ७० पशुवैद्यक (डॉक्टर) तालुक्यात काम करतात. त्यातील निवडक २५ पशुवैद्यकांना प्रत्येकी १० निवडक शेतकरी देण्यात आले..त्या प्रत्येक शेतकऱ्यांकडील किमान पंधरा लिटर दूध देणाऱ्या पाच गाई अशा सर्व मिळून १२५० गाई निश्चित केल्या. वय, वेत आणि दूध देण्याची क्षमता या बाबींची संघाच्या ॲपवर नोंद करण्यात येत आहे. आठ महिन्यांपूर्वी आधुनिक पैदास तंत्राद्वारे पहिल्या टप्प्यात सुमारे दोनशे कालवडी मिळाल्या आहेत. पंजाबमध्ये अशा अभियानातून पंधरा वर्षांत प्रति दिन पन्नास ते साठ लिटर दूध देणारी गाय निर्माण करता आली. संगमनेर तालुका दूध संघाने हे उद्दिष्ट तिसऱ्या टप्प्यापर्यंत म्हणजे सात वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे..त्यासाठी पंजाब राज्याचे मार्गदर्शन मिळावे म्हणून संघ व महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशनचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख आणि पंजाब प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशनचे अध्यक्ष दलजितसिंग गिल यांच्यात करार झाला आहे. या उपक्रमात कालवड संगोपनावर विशेष भर देण्यात आला आहे. जाळीची रचना तयार करून स्वतंत्र पद्धतीने त्यांना ठेवण्यात येत आहे. कालवडी १३ ते १५ महिन्यातच गाभण अवस्थेत येत आहेत..प्रत्येक शेतकऱ्यांच्या दारात पन्नास लिटर दूध देणारी गाय उभी करण्याचे स्वप्न सात वर्षांत पूर्ण करणार आहोत. दुग्ध हा केवळ पूरक व्यवसाय म्हणून न राहाता त्यातून शेतकरी हे उद्योजक म्हणून घडावेत हा आमचा प्रयत्न सफल होत आहे.रणजितसिंह देशमुख, संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ (राजहंस)रणजितसिंह देशमुख ९८५०५५८१२०डॉ. विजय कवडे ८२०८४५३०३१.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.