
उजनी, जि. लातूर : वारंवार पाठपुरावा करून देखील शेतकऱ्यांना अद्यापही विमा (Crop Insurance) मिळालेला नाही. विमा कंपनीने (Crop Insurance Company) २० डिसेंबरपर्यंत लातूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना विमा मिळेल असा शब्द दिला होता. तो शब्द त्यांनी पाळला नाही.
परिणामी परिसरातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्या अनुषंगाने तालुक्यातील शेतकऱ्याची पोरं संघटनेच्या वतीने जिल्हा कृषी अधिक्षकांच्या दालनात १६ जानेवारी पासून ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य शिंदे यांनी दिली.
यासंदर्भात अधिक माहितीनुसार, ६ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांची जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. या बैठकीत विमा देण्यासाठी २० डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांना मुदत देण्यात आली होती. परंतु आज जवळपास महिना उलटून देखील विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा जमा केलेला नाही.
कृषी विभागाने विमा योजनेची जाहिरात केल्यामुळेच कृषी विभागावर विश्वास ठेवत आम्ही शेतकऱ्यांनी विमा कंपनीला विमा भरलेला आहे, यामुळे शेतकऱ्यांना विमा मिळवून देण्याची सर्वस्वी जबाबदारी ही कृषी विभागाची असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची पोरं संघटनेच्या वतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या दालनात १६ जानेवारी पासून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ विमा जमा करण्यात यावा. ज्या शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणात कमी विमा आलेला आहे, त्यांना वाढीव विम्याची रक्कम मिळावी आणि ऑनलाइन तक्रार करताना नुकसानीचे कारण चुकल्यामुळे ज्या शेतकऱ्यांना विमा योजनेतून वगळण्यात आलेले आहे, त्यांनाही योजनेत समाविष्ट करून घ्यावे आदी मागण्यांसाठी हे ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.