
Nagar News नगर ः ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांची ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ ही (Dam Sludge) आवडती योजना आता सरकार प्रभावीपणे राबविणार आहे. ही योजना शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती करेल, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांनी पारनेर तालुक्यातील एका कार्यक्रमात व्यक्त केले.
यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पद्मश्री पोपटराव पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘जलक्रांतीत अण्णा हजारे, पोपटराव पवार यांचे मोठे योगदान आहे. अण्णांना अनेक दिवसानंतर भेटून आनंद झाला. ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ ही गावे जलस्वयंपूर्ण करण्याची योजना जाहीर केली.
अण्णा हजारे यांची ही आवडती योजना आहे. ही योजना त्यांच्या विचारातूनच सरकार राबवत आहे. शेतीला पाणी, वीज असली तरच शेतकऱ्यांना शेती प्रभावीपणे करता येईल. ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ या योजनेतून शेती निश्चित स्वयंपूर्ण होईल. राज्य सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना जाहीर केलेल्या आहेत.
हजारे आणि पवार यांच्या प्रेरणेतून सुरू केलेली जलयुक्त शिवार योजना मधल्या काळात राजकारणामुळे बंद पडली होती. आता ती पुन्हा सुरू करीत आहोत. धरणांतील गाळ काढला जाऊन पाण्याची साठवण क्षमता वाढेल आणि तोच गाळ शिवारात आल्याने उत्पादन वाढीस मदत होईल. यातून गावे जलस्वयंपूर्ण होतील. आपल्या संस्कृतीत गायीची पूजा केली जाते, गाईला माता मानले जाते.
शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी पशुधन आवश्यक आहे. शेती आणि पशुखाद्य क्षेत्रातही नैसर्गिक उत्पादने आणि दर्जा यावर भर दिला पाहिजे. रासायनिक खतांवरील खर्च कमी होऊन नैसर्गिक शेतीला चालना मिळाली तर शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत होऊन नफाही वाढेल. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविताना या गोष्टींकडेही लक्ष दिले पाहिजे. राळेगणसिद्धी येथून सौर कृषिपंप फीडर योजना सुरू झाली.’’
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.