
Mumbai News : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी (ता. १७) ४१ हजार २४३ कोटी २१ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. यामध्ये राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेतील पात्र शेतकऱ्यांसाठी चार हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात या योजनेची घोषणा करण्यात आली होती. त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
राज्यातील अनुदानीत शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या पहिल्या तीन हप्त्याची थकबाकी आणि चौथा हप्ता अदा करण्यासाठी ३ हजार ५६३ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजनमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात २०२३-२४ या वर्षाच्या पुरवणी मागण्या सादर केल्या.
४१ हजार २४३ कोटींच्या पुरवणी मागणीत १३ हजार ९१ कोटी अनिवार्य खर्चाच्या, २५ हजार ६११ कोटी रुपये कार्यक्रमांतर्गत खर्चाच्या, २ हजार ५४० कोटींचा निधी हा केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आहे. या पुरवणी मागण्यांवर पुढील आठवड्यात २४ आणि २५ जुलैला चर्चा होऊन त्या मंजूर केल्या जातील.
नमो महासन्मानचा हप्ता जुलैअखेर शक्य
पुरवणी मागणीत जल जीवन मिशन योजनेसाठी सर्वाधिक म्हणजे ५ हजार, ८५६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकारने २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची मदत देणारी योजना घोषित केली होती. त्यानुसार पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी चार हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जुलै अखेरपर्यंत मदतीचे पैसे जमा होण्याची शक्यता आहे.
आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शहरी तसेच ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांच्या विकासासाठी तब्बल अडीच हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यातील एक हजार कोटी शहरी भागातील लोकप्रतिनिधीना तर दीड हजार कोटी रुपये ग्रामीण भागातील आमदारांना मिळणार आहेत.
राज्यातील लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या पात्र शेतकऱ्यांना अनुदान म्हणून ५५० कोटी, पात्र सहकारी साखर कारखान्यांना मार्जिन मनी लोन उपलब्ध करून देण्यासाठी ५४९ कोटी तर केंद्रीय आधारभूत किंमत योजनेखालील तूट भरून काढण्यासाठी ५२३ कोटी रुपयांचा निधी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात आला आहे.
खातेनिहाय निधी
नगरविकास : ६ हजार २२४ कोटी
पाणी पुरवठा आणि स्वच्छता: ५ हजार ८७३ कोटी
कृषी आणि पदुम : ५ हजार २१९ कोटी
शालेय शिक्षण आणि क्रीडा : ५ हजार १२१ कोटी
सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य :४ हजार २४४ कोटी
सार्वजनिक बांधकाम: २ हजार ९८ कोटी
ग्रामविकास: २ हजार ७० कोटी
आदिवासी विकास:१ हजार ६२२ कोटी
महिला आणि बालविकास:१ हजार ५९७ कोटी
सार्वजनिक आरोग्य :१ हजार १८७ कोटी
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.