
Satara News : शासनाने आता फक्त एक रुपया भरून शेतकऱ्यांना पीकविमा योजनेत सहभागी होण्याची संधी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडणार नाही. या पीकविमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम दिनांक ३१ जुलै आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय, महसूल मंडलनिहाय पीक क्षेत्र अधिसूचित केले असून, त्याप्रमाणे भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद व खरीप कांदा या ९ पिकांसाठी जिल्ह्यात ही योजना लागू आहे.
महत्त्वाचे म्हणजे या योजनेत सहभागासाठी शेतकऱ्यांनी फक्त १ रुपया भरावयाचा आहे. उर्वरित विमा हप्ता शासन भरणार आहे.या योजनेमध्ये कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांनाही सहभागी होता येणार आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना ऐच्छिक असल्याने त्यांना ज्या शेतातील अधिसूचित पिकाचा विमा काढायचा आहे.
त्या शेताचा ७/१२ उतारा, खाते उतारा (८ अ) घेऊन ज्या राष्ट्रीयीकृत अथवा जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते आहे त्या ठिकाणी विमा हप्ता भरायचा आहे. तसेच सार्वजनिक सुविधा केंद्र, पोस्ट कार्यालय, विमा कंपनीच्या संकेतस्थळावरूनही हप्ता भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
योजनेतील संरक्षित बाबी पुढीलप्रमाणे
पीक पेरणी पूर्वी/लागवडीपूर्वी नुकसान भरपाई, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत नुकसान भरपाई निश्चित करणे, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत उत्पादनात येणारी घट (उभे पीक), स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान, काढणीपश्चात नैसर्गिक कारणांमुळे होणारे नुकसान.
योजनेत सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज बँकेकडे व विमा कंपनीकडे उपलब्ध असून शेतकऱ्यांनी ज्या बँकेत खाते आहे तेथे अथवा विमा कंपनीच्या कार्यालयात, सार्वजनिक सुविधा केंद्र, विमा कंपनीच्या संकेतस्थळाद्वारे हप्ता भरावा.
अधिक माहितीसाठी कृषी सहायक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.