
Pune News : ‘‘अन्नदाता शेतकऱ्याच्या श्रमशक्तीचा सन्मान करण्यासाठी केंद्राच्या धर्तीवर राज्यात लागू झालेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. या योजनेचा पहिला हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल’’, अशी ग्वाही कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (ता. १) पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजिलेल्या कृषिदिन सोहळ्यात ते बोलत होते. कृषी आयुक्त सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडी, जिल्हा कृषी विकास अधिकारी अशोक पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे उपस्थित होते.
सत्तार म्हणाले, “गोरगरीब शेतकरी, शेतमजुरांसाठी असलेल्या योजना कागदावर राहू नये, यासाठीच आता ‘शासन तुमच्या दारी’ ही संकल्पना राबविली जात आहे. मार्चअखेरीस योजनांचा निधी परत जाऊ नये, अशी सरकारची भूमिका आहे.
ऑनलाइन कार्यपद्धती स्वीकारल्यामुळे सरकारी योजनांमधील दलाल, एजंट हद्दपार झाले आहेत. विमा कंपन्या शेतकऱ्यांची अडवणूक करीत होत्या. मी आग्रह धरल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी एक रुपयात पीकविमा योजना लागू केली. अपघातग्रस्त शेतकऱ्याला मदतीसाठी विमा केवळ १०० दिवसांत दोन लाखांची भरपाई मिळवून देणारी नवी ‘शेतकरी अपघात मदत योजना’ सुरू करण्यात आली आहे.”
प्रगतिशील शेती करीत विक्रमी उत्पादन घेणाऱ्या निवडक शेतकऱ्यांचा सत्कार या वेळी कृषिमंत्र्यांनी केला. त्यांनी या शेतकऱ्यांशी संवादही साधला. “राज्याच्या काही भागात अजूनही समाधानकारक पाऊस नाही. मात्र यापूर्वी पावसाअभावी १३ वेळा खरिपाच्या पेरण्या १५ जुलैपर्यंत झाल्याच्या नोंदी आहेत.
यंदा जुलैच्या मध्यानंतर चांगल्या पावसाचे संकेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवालदिल होऊ नये. पावसाची वाट पाहावी. शासन आपत्कालीन स्थिती तुमच्या पाठीशी आहे.” अशा शब्दांत कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले.
चव्हाण म्हणाले, ‘‘जलसंधारण, रोजगार, पंचायत राज व्यवस्था आणि कृषी क्षेत्रात वसंतराव नाईक यांनी मौलिक काम केले. त्यांच्या कामाचे स्मरण करण्यासाठीच शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी संजीवन सप्ताह साजरा केला जातो.
१९७२ च्या दुष्काळात त्यांनी रोजगार हमी योजना सुरू केली. तीच योजना आज देशभर स्वीकारली गेली. सध्याचे राज्याचे अन्नधान्य उत्पादन विक्रमी होण्यास वसंतरावांच्या क्रांतिकारी कृषी सुधारणा कारणीभूत आहेत.’’
‘८० टक्के भाग कायम कोरडवाहू राहणार’
“राज्याचा केवळ २० टक्के भाग सिंचनक्षम आहे. ८० टक्के भाग कायम कोरडवाहू राहील. कितीही धरणे बांधली तरी उपयोग होणार नाही. उपलब्ध लागवडयोग्य जमिनीपैकी २०० लाख हेक्टरहून अधिक जमिनीला केवळ जलसंधारणाचे उपाय उपयुक्त ठरतील. ते वसंतराव नाईक यांनी ओळखले होते. त्यामुळेच त्यांनी जलसंधारणाची मुहूर्तमेढ रोवली व अण्णा हजारे, पोपटराव पवार यांनी या संकल्पनेला पुढे नेले,” असे कृषी आयुक्तांनी भाषणात नमूद केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.