Akola News : या खरीप हंगामात लागवड झालेल्या प्रमुख पिकांचा वीमा काढण्याचे काम जोमाने सुरु आहे. विमा उतरविण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक आहेत. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत आतापर्यंत सुमारे २४ लाख ४१ हजारावर शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे.
पीकविमा काढण्यासाठी एकच गर्दी होत असल्याने सध्या शेतकऱ्यांसमोर अडचणी वाढल्या आहेत. एका अर्जासाठी कुठे दोन ते तीन तास लागत आहेत. काही ठिकाणी तर ही प्रक्रिया रात्री करावी लागत आहे.
या खरीप हंगामापासून राज्यात सर्वसमावेशक पीक योजना राबविली जात आहे. योजनेत केवळ एक रुपया भरून शेतकऱ्याला सहभागी होता येत आहे. शेतकऱ्यांचा या योजनेकडे कल वाढल्याचे चित्र आहे.
यंदा सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे. तातडीने या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी धडपडत आहेत. आतापर्यंत अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यात ३ लाख ५६ हजार ५७८, बुलडाणा जिल्हा ६ लाख २१ हजार १०६, वाशीम ३ लाख ७९ हजार, यवतमाळ ७ लाख ११ हजार तर अमरावती जिल्ह्यात ३ लाख ७३ हजारावर शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. विभागात २० लाख २ हजार ८६१ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आहे. तीन दिवस शिल्लक असल्याने यामध्ये आणखी भर पडणार आहे.
नुकसानीच्या सूचना देण्यासाठी धडपड
या हंगामात गेल्या काही दिवसांत सततचा पाऊस व पुरामुळे पिकांचे नुकसान होत आहे. या पीक नुकसानीच्या पूर्वसूचना कृषी विभाग व विमा कंपनीकडे मोठ्या प्रमाणात येत आहेत.
बुलडाणा जिल्ह्यात दीड लाख हेक्टर, अकोल्यात १ लाख ४० हजारावर तर वाशीम जिल्ह्यात ४५ हजार हेक्टरपर्यंत पिके बाधित झालेली आहेत. हजारो हेक्टर जमीन खरडून गेली आहे. या नुकसानीच्या सूचना देण्यासाठीही शेतकरी धडपडत आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.