शेतकऱ्यांचे हित ही आपली सर्वोच्च प्राथमिकता आहे, अशी ग्वाही देणाऱ्या पंतप्रधानांनी प्रत्यक्षात अमेरिकेपुढे नांगी टाकत शेतकऱ्यांचा बळी दिला आहे.अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापारी करार अखेर मार्गी लागला, ही बातमी जगाला आणि भारताला कळाली ती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमांवर केलेल्या एकतर्फी घोषणेमुळे. भारतात संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. पण सरकारने संसदेला आणि पर्यायाने देशातील जनतेला अंधारात ठेवून या करारावर शिक्कामोर्तब केले. दीर्घकाळ रखडलेला करार अचानक एका रात्रीत मार्गी लागणे हेच मुळात संशयास्पद आहे. .वास्तविक दोन सार्वभौम देशांमधील करार उभय देशांच्या संयुक्त निवेदनाद्वारे जाहीर केला जातो. पण औचित्याचा आणि आपला छत्तीसचा आकडा असल्याचे ट्रम्प यांनी कधीच लपवलेले नाही. तसेच करारासंबंधात ट्रम्प महाशयांच्या समाजमाध्यमावरील पोस्ट खेरीज कोणताही अधिकृत तपशील आजमितीसही उपलब्ध नाही. परंतु ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यांनुसार भारत रशियाकडून तेल खरेदी बंद करणार, अमेरिकेवरील आयात शुल्क शून्य करणार आणि भारताची बाजारपेठ अमेरिकेच्या शेती उत्पादनांना खुली करणार या अटींवर हा करार झालेला आहे..US India Trade Deal: अमेरिका व्यापार करारामुळे शेतकऱ्यांवर परिणामाची भीती.अमेरिकेच्या कृषिमंत्री ब्रुक रॉलिन्स यांना या करारामुळे आनंदाचे भरते आले. भारताची प्रचंड लोकसंख्येची बाजारपेठ खुली झाल्यामुळे अमेरिकेत शेतीमालाच्या किमती वाढतील, ग्रामीण अमेरिकेत पैसा खुळखुळेल आणि तिथल्या शेतकऱ्यांचे भले होईल असे त्या म्हणाल्या. त्या अमेरिकेच्या कृषिमंत्री असल्यामुळे त्यांनी आपल्या देशातील शेतकऱ्यांच्या हिताची काळजी वाहणे साहजिकच आहे. पण त्या वेळी भारताचे कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान नेमके काय करत होते?.ट्रम्प महाशयांनी भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी रात्री साडेदहा वाजता कराराची घोषणा केली. त्यानंतर चौहान यांनी रात्री दीड वाजता या कराराचे स्वागत करणारे ट्विट केले. एवढा कार्यतत्पर कृषिमंत्री जगाच्या पाठीवर दुसरा कोणी नसेल. याला म्हणतात कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ! ट्रम्प यांचा दावा खरा मानल्यास सोयाबीन, मका, कापूस, इथेनॉल, दुग्ध उत्पादनांना भारताची बाजारपेठ खुली होईल. अमेरिकेत शेतकऱ्यांना प्रचंड अनुदान दिले जाते. त्यामुळे तिथल्या स्वस्त शेतीमालाचा भारतात महापूर येऊन इथल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडेल. आधीच आस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे जेरीस आलेल्या शेतकऱ्यांची अवस्था दे माय धरणी ठाय होईल..India US Trade Deal: भारत-अमेरिका कराराचा आपल्या शेतकऱ्यांवर काय परिणाम होईल?; खर्गेंचा सरकारला सवाल.वास्तविक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमार यांच्या हिताशी कोणतीही तडजोड करणार नसल्याची निःसंदिग्ध ग्वाही दिली होती. पण प्रत्यक्षात अमेरिकेच्या दबावापुढे मान झुकवत त्यांनी शेतकऱ्यांचा बळी देऊन करार पदरात पाडून घेतला. अमेरिकेबरोबर इतर कोणत्याही देशाने केलेल्या कराराच्या तुलनेत हा सर्वोत्कृष्ट करार असल्याचे सत्ताधारी सांगत आहेत. वास्तविक अमेरिकेने भारतावर आधी ३.३ टक्के असलेले आयात शुल्क भरमसाट वाढविल्यानंतर ते आता १८ टक्के केले आहे. तर भारत अमेरिकेच्या वस्तूंवर सध्या आकारत असलेले १७ टक्के आयात शुल्क आता शून्यावर येणार आहे. मग हा करार भारताच्या फायद्याचा कसा?.या करारामध्ये शेतीसंदर्भात नेमक्या कोणत्या तरतुदी आहेत, याविषयी अजून काहीच स्पष्टता आलेली नाही. भारताचे वाणिज्यमंत्री शेती आणि डेअरीसारखे संवेदनशील विषय या करारातून वगळल्याचे सांगत आहेत. तसे असेल तर मग अमेरिकेच्या कृषिमंत्री आणि तिथले शेतकरी जल्लोष का करत आहेत? वाणिज्यमंत्र्यांच्या खुलाशामुळे कराराविषयी स्पष्टता येण्याऐवजी संभ्रमच वाढला आहे. त्यामुळे आता पंतप्रधानांनीच तातडीने या करारातील नेमक्या तरतुदी काय आहेत, याची माहिती संसदेत देणे श्रेयस्कर ठरेल. पंतप्रधानांनी (छप्पन इंची) छातीचा कोट करून भारतीय शेतीचे संरक्षण केले की शेतीचे तेरावे घालण्याचा मार्ग प्रशस्त केला, याचे उत्तर त्यातूनच मिळेल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.