Indian Summer Weather: एप्रिल महिन्याचा तापमानवाढीचा नकाशा अनेक वृत्तपत्रांत झळकला आहे, सोशल मीडियावर देखील तो फिरतोय. त्यात संपूर्ण देश गर्द लाल रंगात बुडून गेलेला दिसत आहे. देशभरात तापमानाचा पारा ४२ ते ४५ अंश सेल्सिअसवर गेला आहे. जगभरातील पहिल्या १५ उष्ण शहरांमध्ये दहा शहरे भारतीय ही बातमी आता जुनी झाली असून, जगभरातील सर्वांत उष्ण १०० शहरांमध्ये भारताची एकाधिकारशाही ही ताजी बातमी आहे. .महाराष्ट्रातील अकोला, वर्धा, यवतमाळ, अमरावती या शहरांचा पारा ४७ अंश सेल्सिअसजवळ पोहोचला आहे. राज्याच्या ग्रामीण भागात उन्हाळी मशागतीसह इतरही शेती कामांची लगबग सुरू आहे, शिवाय लग्नसराईचा हा हंगाम असल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना घरातून बाहेर पडावे लागत आहे..त्यामुळे लातूर, अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यांत उष्माघाताचे तीन बळी ठरले आहेत. एप्रिलमध्येच वाढत्या तापमानाचे चटके असह्य होत असताना तप्त उन्हाळ्याचा समजला जाणारा मे अजून बाकी आहे, त्यातील होरपळीच्या आठवणीने अंगावर काटा येतोय. त्यातच विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे..Maharashtra Weather Update: विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज.ही केवळ उष्णतेची लाट नाही, तर वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाच्या असमतोलाची हाक आहे. ही हाक ऐकू येण्यास आपल्यासह जगाला आधीच उशीर झाला आहे. आता हे गांभीर्याने घेतले नाही, तर पुन्हा कोणालाही पश्चात्तापाची संधी मिळणार नाही..गेल्या काही दिवसांत वाढत्या उष्णतेने सर्वसामान्यांचे जगणे कठीण केले आहे. उष्माघाताने होणारे मृत्यू हा त्याचाच परिणाम! आता तापमान वाढलेले असताना त्यापासून बचावाला प्रथम प्राधान्य द्यायला हवे. स्थानिक प्रशासनाने उष्माघातापासून बचावासाठी दिलेल्या उपायांचे सर्वांनी तंतोतंत पालन करायला हवे..Summer Heatwave Record: अमरावती, वर्धा, यवतमाळमध्ये एप्रिलमधील उच्चांक.भर दुपारी शक्य तो बाहेर न पडणे, उन्हात फिरताना डोक्यावर टोपी किंवा रुमाल, सुती कपडे यांसह भरपूर पाणी पिणे हे उपाय सहज शक्य असताना त्याकडे दुर्लक्ष होणार नाही, ही काळजी घ्यायला हवी. कधी काळी बऱ्यापैकी सावलीत विसावणाऱ्या भूमीला आज उष्णतेच्या जाळ्यात आपण अडकविले आहे. निसर्ग एका मर्यादेपलीकडे काहीच सहन करीत नाही, तर तो आपल्याला उत्तर द्यायला सुरुवात करतो..तापमानात एक अंश सेल्सिअस वाढ झाली, तरी अनेक पिकांच्या उत्पादनात बऱ्यापैकी घट होते. हे असेच चालू राहिले तर एक दिवस जगाच्या अन्नसुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. वातावरणातील तापमान वाढीपेक्षा घातक हे समुद्रातील पाण्याचे आणि भूमीचे तापमान वाढ आहे..समुद्रातील तापमानवाढीने एकंदरीतच ऋतुचक्र बिघडून नैसर्गिक आपत्ती वाढताहेत. भूमीचे तापमान वाढल्याने रात्रीचा उकाडा देखील वाढला आहे. जंगलांना लागणाऱ्या आगींची संख्या वाढली आहे. वणव्यात केवळ झाडे जळत नाहीत तर तेथील संपूर्ण जीवसृष्टी नष्ट होते. त्यामुळे अजूनही वेळ गेली नाही. हा लढा आता हवामान बदलाशी नसून आपल्याच अस्तित्वाचा झाला आहे..अजूनही वेळ गेलेली नाही, जागे व्हा. खरी संपत्ती ही निसर्गच आहे, हे समजून त्याला धक्का पोहोचणार नाही, याची काळजी घ्या. वृक्ष तोड पूर्णपणे थांबवा. झाडे लावा, ती जगवा, जंगले नष्ट करू नका. कर्ब उत्सर्जन शून्यावर आणा. त्याकरिता जीवाश्म इंधनाऐवजी जैव इंधनावर भर द्या. अक्षय ऊर्जास्रोतांचा वापर वाढवा. तापमानवाढ ही जागतिक समस्या आहे. त्यामुळे एकट्या दुकट्या देशाने नाही, तर सर्व देशांनी मिळून तापमानवाढ कमी करण्यासाठीचे एकत्रित प्रयत्न करा..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.