एखाद्या ठिकाणची पक्षी प्रजाती नष्ट होणे, त्यांची संख्या कमी होणे, पक्ष्यांचे स्थलांतर विस्कळीत होणे हे केवळ एका जीवजातीचे नुकसान नसून ती संपूर्ण परिसंस्थेसाठी धोक्याची घंटा आहे. .दरवर्षी हिवाळ्याची चाहूल लागताच उजनीच्या विस्तीर्ण जलाशयावर गुलाबी रंगाची उधळण करणारे फ्लेमिंगो यंदा मात्र फेब्रुवारीचा पहिला आठवडा उलटून गेला तरी आले नाहीत. शिवाय पावसाळा संपताच सोलापूरच्या माळरानावर येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांची संख्या देखील यंदा कमीच राहिली आहे. मागील मॉन्सूनमध्ये पाऊस जास्त झाला. शिवाय ऑक्टोबर-नोहेंबरपर्यंत पाऊस पडत होता. हे पक्ष्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उजनीकडे फ्लेमिंगोसह इतरही स्थलांतरित पक्ष्यांनी पाठ फिरविल्यामागचे कारण सांगितले जात आहे. फ्लेमिंगोसारख्या पक्ष्यांना अन्नाच्या शोधासाठी उथळ पाणी आणि चिखलमय किनाऱ्याची गरज भासते..Migratory Birds: हरिश्चंद्रगड परिसरात स्थलांतरित दुर्मीळ पक्ष्यांचे दर्शन.दरवर्षी उजनी धरण तसेच हिप्परगा तलावासह जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पांमध्ये डिसेंबर अखेरीस पाणी कमी होते. पाणी कमी असलेल्या चिखलातील कीटक तसेच शेवाळ हे फ्लेमिंगो, पट्टकादंब, क्रौंच या पक्ष्यांचे खाद्य आहे. परंतु यंदा मात्र उजनीच्या बॅक वॉटर परिसरात पाणी असल्याने या पक्ष्यांना खाद्य उपलब्ध होत नाही. त्यामुळे काही पाणपक्षी वगळता फ्लेमिंगोसह इतरही स्थलांतरित पक्ष्यांची संख्या घटली आहे. धरणातून शेती सिंचनासाठी आवर्तने सुरू झाल्यानंतर उथळ, पाणथळ ठिकाणे तयार झाल्यावर येथे पक्ष्यांची संख्या वाढेल, अशी आशा परिसरातील नागरिकांना आहे. परंतु उशिराने या पक्ष्यांचे आगमन झाले, तरी त्यांची संख्या खूप कमी असणार, असे मत यातील जाणकार व्यक्त करीत आहेत..उजनी धरणाच्या मागील बाजूस (बॅक वॉटर) फ्लेमिंगोसह स्थलांतरित पक्ष्यांना पाहण्यासाठी दरवर्षी पर्यटकांची मोठी गर्दी असते. मात्र यंदा पक्ष्यांचे दर्शन दुर्मीळ झाल्याने पर्यटक तिकडे फिरकताना दिसत नाहीत. त्यामुळे स्थानिक पर्यटन व्यावसायिकांमध्ये आणि पक्षिप्रेमींमध्ये सुद्धा निराशेचे वातावरण आहे. उजनी जलाशयात फ्लेमिंगोसह इतर पाणपक्षी घटण्यामागे केवळ अधिक पाऊसमान हे एकच कारण नाही. गेल्या काही वर्षांपासून उजनी धरणातील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे..Migratory Birds: उजनीवर स्थलांतरित मत्स्याहारी पक्ष्यांचे आगमन.औद्योगिक क्षेत्रातून थेट भीमा नदीत सोडण्यात येणारे रसायनमिश्रित सांडपाणी, पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांतून येणारे प्रक्रिया न केलेले सांडपाणी, यामुळे धरणातील पाण्याचा दर्जा खालावला आहे. या प्रदूषित पाण्यामुळे उजनी जलाशयातील अन्नसाखळी धोक्यात आली आहे. शिवाय सोलापूरच्या माळरानावर देखील वाढत्या मानवी हस्तक्षेपाने स्थलांतरित पक्ष्यांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे हवामान बदल, पर्यावरण असंतुलनाचा हा परिणाम असल्याचे सांगून याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शिवाय ही समस्या केवळ उजनीपुरती मर्यादित नाही..कोकण किनारपट्टीसह इतरही ठिकाणच्या पक्षी निरीक्षणातून असेच काहीसे चिंताजनक वास्तव पुढे आले आहे. वाढते शहरीकरण, जंगलतोड तसेच मोठ्या झाडांच्या कत्तलीतून पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, पिकांवर कीडनाशकांच्या अनियंत्रित फवारण्या, तलाव, धरणे, नदी-नाले, समुद्र यांचे अनेक कारणांनी वाढते प्रदूषण, यामुळे काही पक्षी प्रजातींची संख्या लक्षणीयरीत्या घटत आहे. वर्षानुवर्षे ठरावीक ठिकाणी स्थलांतर करणारे पक्षी आपल्या जागा बदलत आहेत. परिणामी जैवविविधतेवरचे हे मोठे संकट म्हणावे लागेल..पक्षी कमी झाल्यामुळे शेतीवरील कीड आणि टोळधाडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक पक्षी फळे खाऊन बियांचा प्रसार करतात. पक्षी घटल्याने नैसर्गिक वनसंपदेच्या पुनरुज्जीवनावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. खाडी आणि समुद्रातील लहान मासे खाणाऱ्या पक्ष्यांच्या कमतरतेमुळे जलचर अन्नसाखळी विस्कळीत होत आहे. यावर वेळीच उपाययोजना केल्या नाही, तर याचे अधिक गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतील, हे लक्षात घेतले पाहिजे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.