पाऊस, ऋतुमान, निविष्ठा, जमिनीचा कस, हवामान बदल, त्यातून हाती येणारे पीक, बाजारभाव या सर्व बाबी विचारात घेऊन शेती करणारा शेतकरी हाच खरे तर आद्य संशोधक आहे.Sustainable Farming 2026: हरित क्रांतीनंतर देशात उल्लेखनीय म्हणावे असे संशोधन झाले नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. खरे तर हरित क्रांतीने अन्नधान्यात स्वयंपूर्णता मिळविली तरी आपला संशोधनाचा सर्व भर हा पिकांची उत्पादकता वाढविणे यावरच राहिला आहे.त्यामुळे पोषण सुरक्षेपासून ते हवामान बदलाची आव्हाने आणि मुख्य म्हणजे शेतकऱ्यांच्या गरजांवर आधारीत देशात म्हणावे तसे संशोधन झाले नाही. याचे मुख्य कारण म्हणजे शेतकरी आणि कृषी संशोधन संस्था तसेच संशोधक यांत संवाद, समन्वयाचा अभाव हे आहे. .या असमन्वयातून कृषी विद्यापीठे असो अथवा संशोधन संस्था त्यांचे संशोधन, नव तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचले नाही, शेतकऱ्यांच्या अडचणी, अनुभव शास्त्रज्ञांपर्यंत पोचले नाही. काही शेतकरी मात्र आपल्या गरजेनुसार शेतात सातत्याने प्रयोग करीत असतात.त्यातून आत्तापर्यंत विविध पिकांच्या वाण संशोधनापासून ते शेतीउपयोगी यंत्रे-अवजारे देखील त्यांनी विकसित केली आहेत. दादाजी खोब्रागडे, पंढरीनाथ मोरे, बाळासाहेब मराळे, राहीबाई पोपेरे, सुभाष शर्मा, प्रताप चिपळूणकर, दादा लाड अशी ही राज्यातील संशोधक शेतकऱ्यांची यादी मोठी आहे. या यादीत अजून एक नाव जोडले गेले ते म्हणजे बाबासाहेब पिसोरे!.Farmer Innovation: तीन शेतकऱ्यांना चार वाणांचे मालकी अधिकार.बाबासाहेब पिसोरे हे मागील पस्तीस वर्षांपासून अहिल्यानगर जिल्ह्यातील डोंगराळ भागात प्रयोगशील शेती करतात. यातूनच त्यांनी कांद्याचा ‘सोना - ४०’ हा वाण विकसित केला आहे. खरीप, लेट खरीप, रब्बी अशा हंगामात येणारा, अधिक उत्पादनक्षम, टिकवणक्षमता चांगली, रोग-विकृती प्रतिकारक शिवाय आकर्षक वजन आणि रंग असल्याने निर्यातीस उपयुक्त या वाणास केंद्र सरकारच्या वाण नोंदणी विभागाने नुकतीच मान्यता दिली आहे. त्यामुळे या वाणाचा पुढील प्रसाराचा मार्ग आता मोकळा झाला आहे. गरज ही शोधाची जननी असते हेच शेतकऱ्यांनी केलेल्या आत्तापर्यंतच्या अनेक संशोधनातून सिद्ध होते..शेती करणे हे पूर्वीही आव्हानात्मक, अवघड होते, आत्ताही आहे. शेती करताना कितीतरी गोष्टींचे भान त्यांना ठेवावे लागते. पाऊस, ऋतुमान, बियाणे, जमिनीचा कस, हवामान बदल, त्यातून हाती येणारे पीक, बाजारभाव या सर्व बाबी विचारात घेऊन शेती करणारा शेतकरी हाच खरे तर आद्य संशोधक आहे.त्यांच्या संशोधनाचा फायदा स्वतःला तर होतोच परंतु पुढे जाऊन त्यांचे हे संशोधन इतरांनाही उपयुक्त ठरत आले आहे. असे असताना त्यांच्या संशोधनाची म्हणावी तशी दखल आत्तापर्यंत घेतली गेली नाही. अधिक दुर्दैवी बाब म्हणजे काही शेतकऱ्यांच्या संशोधनावर त्यांना श्रेय न देता व्यावसायिक, व्यापारी गब्बर झाले आहेत..Innovative Farmer Award : अंकुश पडवळे यांना केंद्राचा नावीन्यपूर्ण शेतकरी पुरस्कार.शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठाच्या संशोधनात सहभागी करून घेतले जाणार, शेतकऱ्यांना संशोधनाविषयी आवड निर्माण व्हावी म्हणून शेतात प्रयोगशाळा उभारल्या जाणार, शेतकरी संशोधनाला जॉइंट ॲग्रेस्को मध्ये स्थान देणार अशा स्वरुपाच्या घोषणा कुलगुरूंपासून ते राज्यकर्त्यांपर्यंत अनेकांनी केल्या.परंतु त्या प्रत्यक्षात कधी उतरल्याच नाहीत. त्यामुळे संशोधक शेतकरी राज्यात उपेक्षितच राहिला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या संशोधनाचे पेटंट मिळाले तरी काही व्यावसायिक त्यांना फसवतात, हा आजवरचा अनुभव आहे..अशा वेळी शेतकरी संशोधकांना त्यांच्या संशोधनाबाबत मान्यता प्रदान करताना संशोधन विस्तारातही त्याच्या हक्काचे संरक्षण व्हावे, अशी कायदेशीर तरतूद करायला हवी. पेटेंटेड संशोधनाचे व्यापारीकरण करतानाचे धोरण हे अधिक सुटसुटीत आणि शेतकरी संशोधक पूरक असायला हवे. गरजेतून झालेल्या शेतकरी संशोधनाच्या प्रसार प्रचाराला प्राथमिकतेचे धोरण देखील हवे. असे झाल्यास शेतकरी संशोधनाला प्रतिष्ठा, खऱ्या अर्थाने राजमान्यता मिळेल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.