MSBTE Exam : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शालान्त व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षांना प्रारंभ होत आहे.आज दिनांक २१ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षांना तर दहावीच्या परीक्षांना एक मार्चपासून सुरुवात होत आहे.
सीबीएसई बोर्डाची १२ वीची परिक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू देखील झाली आहे. विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या अभ्यासाचा कस या परीक्षांच्या निमित्ताने लागणार आहे. मागील काही वर्षांपासून आपण पाहतोय, दहावी, बारावीची परीक्षा म्हटले, की बहुतांश केंद्रांवर कॉप्यांचा सुळसुळाट चालतो.
काही परीक्षा केंद्र तर कॉप्यांसाठी नावाजलेलीच आहेत. कॉपी हा परीक्षेतील तात्पुरत्या यशासाठीचा शॉर्ट कट आहे. याद्वारे विद्यार्थी पास होत असले तरी पुढील शैक्षणिक तसेच नोकरी-व्यवसायातील आयुष्यात मात्र कॉपीबहाद्दर मागे पडतात, हे वास्तव नाकारता येत नाही. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ खऱ्या अर्थाने हाताला लागावे म्हणून कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्याचे आव्हानदेखील आहेच.
या परीक्षांच्या अनुषंगाने महाराष्ट्रभर जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत. परीक्षेत ज्या परीक्षा केंद्रांवर कॉपी केस आढळून येईल त्या केंद्रांवरील पर्यवेक्षक, केंद्रसंचालक, बैठे पथकातील सदस्यांची एक वेतनवाढ रद्द करण्यात येणार आहे. त्याचबरोबर तालुका अंतर्गत पर्यवेक्षक बदलाचाही निर्णय घेण्यात आलेला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता समितीच्या बैठका राज्यभर पार पडलेल्या आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक, प्राथमिक-माध्यमिक व योजना या तीन शिक्षण विभागांचे शिक्षणाधिकारी यांच्याबरोबर पर्यवेक्षीय यंत्रणेने चोख तयारी केलेली आहे. दोन्ही परीक्षांना लाखो विद्यार्थी सामोरे जाताना सुसज्ज परीक्षा केंद्रांची व्यवस्था तयार करण्यात आलेली आहे. त्यामध्ये बैठक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, प्रसाधन गृहे, वीजपुरवठा, वाहतूक आदींचे नियोजन केलेले आहे.
प्रत्येक परीक्षा केंद्रावर महसूल व जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी आणि शिक्षकांचे बैठे पथके नियुक्त करण्यात येणार आहेत. जिल्हा पोलिस प्रशासनास कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. परीक्षा कालावधीमध्ये शिक्षण विभागाची भरारी पथके स्थापन करण्यात आली असून, यामध्ये शिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व माध्यमिक विभागाच्या उपशिक्षणाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
तर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार उपजिल्हाधिकारी, प्रांतअधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांचेही आकस्मित भरारी पथक परीक्षा काळात कार्यरत राहणार आहे. ज्या शाळेतील विद्यार्थी परीक्षा केंद्रावर राहणार आहेत, त्या शाळेतील शिक्षक परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षणासाठी राहणार नाहीत. विषय शिक्षकांना त्या विषयाच्या पेपरच्या दिवशी पर्यवेक्षणातून वगळण्यात येणार आहे.
परीक्षा केंद्र परिसरात १४४ कलम लागू असणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलिस बंदोबस्त तर आहेच, याबरोबरच परिरक्षक कार्यालयातून रनरसोबत प्रश्नपत्रिका घेऊन जाण्यासाठी व उत्तरपत्रिका परत घेऊन येण्यासाठी एक पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आलेला आहे. कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात परीक्षा पार पडणार आहेत.
दहावी-बारावीच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांचे भविष्य ठरणार असते. त्यामुळे परीक्षार्थी व स्पर्धक या दुहेरी भूमिकेत असणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांनी सजगपणे परीक्षेला सामोरे जाणे अपेक्षित आहे. सर्वांच्या समन्वयातून साध्य होणाऱ्या या परीक्षांच्या संदर्भाने यासाठी दखल, की आता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची भिस्त ही मुलांवर आणि शिक्षणावरच अवलंबून आहे.
लाभाच्या दृष्टिकोनातून ऐपत नसताना सर्वांबरोबर शेतकऱ्यांनीही प्रचंड आर्थिक ताण सहन करून मुलांना शिक्षणाच्या स्पर्धेत उतरविले आहे. त्यामुळे निकोप वातावरणात या परीक्षा व्हाव्यात. सर्व परीक्षार्थींना परीक्षेसाठी शुभेच्छा!
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.