‘दामिनी’ वाचवेल जीव

स्मार्ट फोन असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी वीज कोठे पडणार याबाबतची माहिती देणारे ‘दामिनी ॲप’ डाउनलोड करून त्याचा वापर सुरू करायला हवा.
Damini App
Damini AppAgrowon
Published on
Updated on

यवतमाळ जिल्ह्यात दोन दिवसांत वीज पडून सहा जणांचा जीव गेलेली घटना ताजी असतानाच विदर्भातच वीज पडून नुकताच चौघांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या इतरही भागांत पावसाळ्यात विजा पडण्याचे प्रमाण वाढले आहे. मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असल्याने विजा पडून होणाऱ्या मृत्यूचे भय संपलेले नाही.

खरे तर मॉन्सूनचे आगमन आणि परतीच्या वेळी विजा कोसळण्याचे प्रमाण अधिक असते. मॉन्सून एकदा चांगला स्थिरावला की मग विजा कोसळण्याचे प्रमाण कमी होते. अलीकडे पावसाळ्याच्या चारही महिन्यांत वादळी पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पावसाळाभर वीज पडण्याचे धोकेही वाढले आहेत.

राज्यात दरवर्षी १००हून अधिक तर देशभरात दोन हजारंहून अधिक लोकांचा वीज पडून मृत्यू होतो. वीज पडण्याचे सर्वाधिक प्रमाण मध्य प्रदेश राज्यात आहे. आपल्या राज्यातही मराठवाडा आणि विदर्भ या दोन विभागांत वीज पडून मृत्यूचे प्रमाण जास्त आहे.

ग्रामीण भागात प्रामुख्याने शेतात उघड्यावर काम करणारे शेतकरी-शेतमजूरच विजेचे अधिक बळी ठरतात. वीज पडून गाई-म्हशी-बैल-शेळ्या-मेंढ्या अशा पशुधनासह पिकेही जळून शेतकऱ्यांचे नुकसान वाढत आहे. सुमारे पाच वर्षांपूर्वी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने वीज पडणे नैसर्गिक आपत्ती घोषित केले आहे. या अंतर्गत वीज पडून मृत पावलेल्यांच्या वारसास तसेच पशुधन मालकाला आर्थिक मदतीची तरतूददेखील आहे. परंतु अनेक जणांना अपेक्षित मदत मिळतच नाही, मिळाली तरी बराच उशीर झालेला असतो.

त्यामुळे वीज पडून होणारी जीवित-वित्त हानी टाळण्यास प्राधान्य द्यायला हवे.विजेचा निकटचा संबंध हा वादळी मेघांशी (क्युम्युलोनिम्बस) असतो. जमिनीवर वीज कोसळते ती याच ढगातून! म्हणून या ढगाचा नीट अभ्यास करून तो ओळखायला शिकले पाहिजेत. या ढगांमध्ये आधी वीज चमकताना दिसते नंतर गडगडाट ऐकू येतो. खरे तर या दोन्ही घटना एकदाच घडतात. परंतु प्रकाशाचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक असल्याने आधी विजांचा लखलखाट दिसतो, नंतर ढगांचा गडगडाट ऐकू येतो.

वीज चमकल्यानंतर किती वेळाने ढगांचा गडगडाट ऐकू येतो, यावरून वादळी मेघ आपल्यापासून किती दूर आहे, याचा अंदाज बांधता येतो. या दोन्हीमधील उशीर जितका कमी तितका वादळी मेघ आपल्या जवळ, असा अंदाज बांधून वीज कोसळणे, वादळी वारा आणि मुसळधार पाऊस यापासून जीव वाचविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.

वीज पडून एकूण मृत्यू होणाऱ्यांपैकी ७१ टक्के लोक विजा चमकताना झाडाखाली उभे राहिलेले आहेत. तर थेट वीज पडून मृत्यूचे प्रमाण २५ टक्के आहे. अशावेळी विजा चमकताना घराबाहेर जाणे टाळावे, शेतात असल्यास पटकन घरी जावे. शेतातच राहायचे असेल तर विजा चमकताना वाहते पाणी, ओली जागा यांच्या दूर राहावे. कोणत्याही झाडाखाली थांबू नये.

वीज कोठे पडणार आहे, याची माहिती देणारे दामिनी ॲप हवामान विभागाने तयार केले आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. बहुतांश शेतकऱ्यांकडे आता स्मार्ट फोन आहेत. स्मार्ट फोन असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी दामिनी ॲप डाउनलोड करून त्याचा वापर सुरू करायला हवा. अजून बहुतांश शेतकऱ्यांना या ॲपबाबत माहिती नसल्याने कृषी विभागाने शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन करावे.

हे ॲप जीपीएस लोकेशनवर काम करीत असून १५ मिनिटे अगोदरच वीज कोठे पडणार, याबाबत माहिती देते. अशावेळी या ॲपच्या माध्यमातून शेतकरी स्वतःचे तसेच आपल्या पशुधनाचा जीव वाचवू शकतात. वीज कोसळून जळणाऱ्या पिकाचेही नुकसान कमी करू शकतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com