Farm Technology and Innovation in China: "जोवर मांजर उंदीर पकडण्याचं काम करतेय, तोवर ती काळी की पिवळी या फंदात पडण्याचं कारण नाही,’’ असे चीनला आर्थिक सुधारणांच्या बुलेट ट्रेनमध्ये बसविणाऱ्या या देशाचे माजी अध्यक्ष डेंग जिआओ पेंग यांचे वचन प्रसिद्ध आहे. चीनच्या मानेवर साम्यवादाचे जू अडकवणाऱ्या माओ त्से तुंग यांच्या कारकिर्दीत अडलेला विकासाचा गाडा वेगाने पळविण्यासाठी डेंग यांनी ज्या काही आर्थिक सुधारणांचा घाट घातला होता, त्या ‘चेअरमन माओ’च्या कथित ध्येयधोरणांपासून फारकत घेत असल्याच्या अनुषंगाने उठलेल्या हाकाट्यांना उत्तर देण्यासाठी आपल्या पोतडीतून डेंग हे वचन वारंवार काढायचे. .अर्थात, त्यांच्या मृगयाप्रवीण मांजरीने किती उंदीर पकडले, याचा अनुभव जग आता घेत आहेच. अनेकदा या चिनी मांजरीच्या बोचकाऱ्यांचा फटका भारताच्या आस्तेकदम चाललेल्या ऐरावतालाही बसतो. पण सध्याचा प्रखर नवराष्ट्रवादी माहोलच असा, की चीनच्या थक्क करणाऱ्या प्रगतीचे सूक्ष्मदर्शी परीक्षण करण्याऐवजी ‘हाथी चलें अपनी चाल, कुत्ते भौंके हजार’ असे म्हणून नव्या भारताचे बाशिंदे आपल्या शेजाऱ्याच्या प्रगतीची वासलात लावतील. अर्थात, कोंबडे आरवले नाही म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही, हेही तितकेच खरे!.Agricultural Research: संशोधनाची दशा अन् दिशा.शेतकऱ्याच्या गळ्यात ‘लाखोंचा पोशिंदा’ अथवा ‘बळीराजा’ अशा संज्ञाप्रवाही शब्दांची माळ न अडकवताही त्याला जागतिक स्पर्धेसाठी कसे तयार करायचे, याचा वस्तुपाठ चिनी सुधारणांनी घालून दिला आहे. विसाव्या शतकाच्या मध्यावर भारत आणि चीन हे दोन्हीही देश साम्राज्यवादी सत्तांच्या जोखडातून मुक्त झाले. दोन्हीही देशांच्या तत्कालीन धुरिणांनी आपापल्या मगदुराप्रमाणे शेतीसह सर्वक्षेत्रीय सुधारणांची पायवाट पकडली. परिस्थितीचा रागरंग ओळखत, प्रसंगी आमूलाग्र हस्तक्षेप करत त्या पायवाटेचा चीनने हमरस्ता केला; आपल्याकडे मात्र या अनुषंगाने होणाऱ्या चर्चांचा बांध मात्र अद्यापही पंडित नेहरूंनीच अडवून ठेवलाय की काय, असाच सूर निघतो..आजघडीस भारत आणि चीन हे दोन्ही जगातील सर्वांत मोठे कृषिप्रधान देश आहेत. मात्र गेल्या चार दशकांत चीनने कृषी संशोधन, पायाभूत सुविधा, यांत्रिकीकरण, डिजिटल तंत्रज्ञान आणि उत्पादनक्षमता यामध्ये मोठी झेप घेतली आहे. भारताने अन्नधान्य उत्पादनात आत्मनिर्भरता मिळवली असली, तरी उत्पादकता, मूल्यसाखळी आणि तंत्रज्ञानाच्या वापरात चीनसह इतर स्पर्धकांच्या तुलनेत अजूनही मोठी तफावत दिसते. आपल्या बाब्याचे घरच्यांनीच मीठमोहरी ओवाळून कोडकौतुक करणे वेगळे आणि पंचक्रोशीत त्याच्या कर्तृत्वाचा गवगवा होणे त्याहून वेगळे. शेजारीच शिरजोर असताना आपल्याला विश्वगुरुत्व मिळणार कुठून?.Farming Success Story: सर्जेरावबापूंची पेरणी गुंठ्यात, हिशेब मात्र लाखमोलाचा !!.वानगीदाखलच उदाहरणे घ्यायची झाली, तर पिकांच्या उत्पादकतेतील तफावतीबाबत विचार करूयात. चीन तांदूळ, गहू, मका, कापूस, भाजीपाला अशा प्रमुख उत्पादनांच्या बाबतीत भारताच्या तुलनेत दुपटीने सरस आहे. याची कारणे म्हणजे, जगातील सर्वांत मोठी कृषी संशोधन यंत्रणा त्या देशात कार्यरत आहे. कृत्रिम प्रज्ञा, जनुक संपादन, रोबोटिक्स, स्मार्ट फार्मिंगवर भर आदी गोष्टी तिथे प्रत्यक्षात आल्या आहेत. तेथील ७० टक्क्यांहून अधिक शेती सिंचनाखाली आली आहे. सुमारे ८० ते ९० टक्के शेतीचे यांत्रिकीकरण झाले आहे..‘सॅटेलाइट टेक्नॉलॉजी’ ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’, ‘बिग डेटा’ अशा आजही आपण बिचकत-बिचकत उच्चारत असलेल्या संज्ञांचा तिथे मुक्त आणि मनमुराद वापर होतो. त्या तुलनेत भारताची अवस्था काय आहे, याचा इथे पुनरुच्चार करण्याची आवश्यकता नाही. ‘सारेच दीप कसे मंदावले आता’ अशीही परिस्थिती नसली तरी आपल्याही अंगणात उद्याचा कृषिसूर्य लख्खपणे उगवावा, ही अपेक्षा येथील शेतकऱ्यांनी देखील करण्यात काही वावगे आहे, असे नाही..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.