
दर्शनशास्त्रामध्ये जी जागा गौतम बुद्धांना आहे, राजनीतिमध्ये जी जागा सम्राट अशोकांना आहे, तीच जागा साहित्यामध्ये कबीर यांची आहे.
हिंदी साहित्याचे पहिले इतिहासकार वार्सा द ताशी यांनी एकोणिसाव्या शतकात तुलसीदासापेक्षा दीडपट जास्तीचा मजकूर कबीरांवर लिहिलेला होता. त्यानंतर नव्वद वर्षांनी विसाव्या शतकात हिंदी साहित्याचा इतिहास लिहिताना रामचंद्र शुक्ल यांनी कबीरांपेक्षा तुलसीदासावर तीनपट जास्त लिहून सगळा इतिहासच बदलून टाकला. विसाव्या शतकात शुक्लजींनी कबीरांच्या समालोचनाची दिशा आणि दृष्टी बदलून टाकली. पण फिनिक्स पक्षासारखे आपल्याच राखेतून पुन्हा कबीर उठून उभे राहिले. फिनिक्सरूपी कबीरांपुढे मी नतमस्तक आहे.
हिंदी साहित्याचा हजार वर्षांच्या इतिहासात कबीर वाणीची हुकूमत समजली जाते. कबीरांची भाषा खूप शक्तिमान आहे. ती तुमचं अंत:करण हलवून टाकते. कबीरांनी त्या काळात दोन टक्क्यांपेक्षाही कमी संस्कृत शब्द वापरून दाखवून दिलं की भाषेचा हुकूमशहा कोण आहे ते. कबीरांच्या भाषेपुढेही मी नतमस्तक आहे.
असं म्हटलं जातं की कबीरांची भाषा फिरस्त्यांची किंवा खिचडी आहे. अनेक भाषांचे मिश्रण आहे. पण खरंतर तसं नाही. उलट ती त्या काळच्या सामान्य माणसांची भाषा आहे. जिच्यात ग्रामजीवनाची अनेक चित्रं ऊमटलेली दिसतात. कबीरांच्या काव्यात विणकर आहेत, खाटीक आहेत, कहार आहेत, कुंभार आहेत, कोळी आहेत, कलाल आहेत, नावाडी आहेत, गवळी आहेत, गुजर आहेत, तांबोळी आहेत, धोबी आहेत, सोनार आहेत. अशा कितीतरी कष्टकरी जाती कबीरांच्या कवितेत आलेल्या आहेत. कबीरांचं सगळं काव्यच या जातींच्या अवजारांच्या शब्दावलीने समृद्ध झालेलं आहे.
कबीरांच्या कवितेत तेली आला असेल तर त्याच्या घाण्याचेही संपूर्ण वर्णन येते. उरलेल्या तीळपेंडीचाही विषय येतो. घाण्यातून जिथे तेल एकत्रित केलं जातं त्याला कबीर 'चाठा' म्हणतात. घाण्यातून पहिल्या दिवशी निघालेलं तेल लोकांना वाटलं जायचं. त्या प्रथेला कबीर 'रतबलिया' असे म्हणतात. कबीरांच्या कवितेत लोहार आलेला असेल तर त्याच्यासोबत त्या व्यवसायातली सगळी शब्दावली येते. उदाहरणार्थ ऐरन, घन, भाता, टाकी, हातोडा, छिन्नी असे कितीतरी शब्द येतात.
जर कबीरांच्या कवितेत विणकर येत असेल तर त्यासोबत त्याची भरणी, करघी, कुच, समरख असे सगळे येते. जर कलाल आला तर त्यासोबत कलाली, गुळ, गाडगे, गाळणी, भरणी असे सगळे येते. कबीर गृहस्थ होते. त्यांचे अनुयायी देखील गृहस्थच होते. त्यामुळे कबीरांच्या कवितेत घरगृहस्थीचे सामान भरलेले आहे. उदाहरणार्थ धान्य, पीठ, कोठी, कटोरा, काठोट, कडची, कात्री, दोरी, बाज, घागर, चटई, जातं, वगराळं, तराजू , ढब्बू पैसा, गाठोडं इत्यादी.
कबीर जेव्हा गवताच्या झोपडीचं रूपक आपल्या कवितेत उपयोजितात तेव्हा ते साधं घर आपल्या डोळ्यासमोर काडीकाडीसह उभं राहतं. त्याचे कुड, छप्पर, झोपाटा, डिळ्या, अडू आपणाला आपल्या डोळ्यासमोर दिसायला लागतात. कबीरांनी लोकजीवन जवळून पाहिलेलं होतं. ते स्वतः तेच जीवन जगत होते. त्यामुळेच कबीर ईश्वराची तुलना श्रमणाऱ्या माणसाशी करतात.
मोरी रंगी चुनरिया धो धुबिया, जनम जनम के दाग चुनर के सत्संग जलसे छुडा धुबिया
मूळ लेखक - राजेंद्र प्रसाद सिंग
अनुवाद - इंद्रजित भालेराव
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.