स्थलांतरीत मजूरांसाठी महामार्गालगत विश्रांती कक्ष : सीईओ आयुष प्रसाद

विश्रांतीगृहामध्ये मुलभूत सेवा, सुविधा पुरवल्या जाणार असून, प्राथमिक आरोग्य तपासणी केली जाणार आहे. प्रवासासाठी सुरू केलेल्या शासकीय सेवांसाठी ऑनलाइन नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध असेल. विश्रांतीगृहाच्या खर्चासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीचा वापर केला जाणार आहे. प्रत्येक तालुक्यासाठी दहा ते वीस लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. - आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे.
आयुष प्रसाद
आयुष प्रसाद

पुणे   ः राज्यातील विविध जिल्ह्यांत अडकलेल्या विस्थापित कामगार, मजुरांना त्यांच्या घरी जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरून येणारे नागरिक विविध महामार्गांवरून प्रवास करत आहेत. उन्हाचा चटका वाढला असून, स्थलांतरीत मजुरांची जेवणाची, थांबण्याची कुठलीच व्यवस्था होत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने महामार्गांवर तत्काळ विश्रांती कक्ष उभारण्याचे ठरवले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांना याबाबत सूचना केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

पायी, सायकलवर किंवा मिळेल त्या मार्गाने कामगार, मजूर गावी परतण्यासाठी प्रवास करत आहेत. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीमुळे रोजी-रोटी कमवणाऱ्या हातांना काम राहिले नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ ओढावली. परिणामी अनेकांनी आपल्या गावी परतण्याचा निर्णय घेतला. वाढवलेल्या टाळेबंदीमुळे गावी जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. पुण्यातून जाणाऱ्या महामार्गांवर स्थलांतरीत होऊन निघालेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पायी किंवा इतर साधनाव्दारे प्रवास करणाऱ्या या मजुरांना विश्रांतीची गरज आहे. जिल्हा प्रशासनाकडून त्यांच्या विश्रांतीसोबतच चहा, नाष्टा, जेवण तसेच शौचालयासह इतर सुविधा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यातील बंगळूरू, सोलापूर, नगर, मुंबई आणि नाशिककडे जाणाऱ्या महामार्गांवर तत्काळ विश्रांती कक्ष सुरू करण्यात येणार आहेत. संबंधित महामार्गावरील तहसीलदार राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीतून स्थानिक ग्रामपंचायतींची मदत घेऊन मजुरांची व्यवस्था करणार आहेत. विश्रांती कक्षात कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांच्या अनुषंगाने सूचनांचे पालन केले जाणार आहे. हात धुण्याची सोय, सॅनिटायझर तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाणार आहे. याठिकाणी स्थानिक पोलिस स्टेशनच्या मदतीने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

मजुरांची नोंद ठेवणार विश्रांतीगृहाच्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक मजुराची स्वतंत्र रजिस्टरमध्ये नोंद ठेवण्यात येणार आहे. यात संबंधित मजुराचा संपर्क क्रमांक, स्वाक्षरी, पत्ता नोंदविला जाणार आहे. विश्रांतीगृहातील दैनंदिन मजुरांच्या उपस्थितीचा अहवाल ग्रामपंचायतींना तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांना सादर करावा लागणार आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com