पुणे ः शेतकरी अडचणीत असल्याने केंद्र सरकारने पाच वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केली आहे. मात्र, कृषी आधारित असलेल्या निविष्ठा, अवजारे यावर केंद्र सरकारने जीएसटी लावल्याने अधिक खर्च होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तो रद्द करावा, अशी मागणी भारतीय किसान संघाचे प्रमुख दिनेश कुलकर्णी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे.
भारतीय किसान संघाचे प्रमुख दिनेश कुलकर्णी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना भेटून बुधवारी (ता. १८) मागण्यांबाबत निवेदन दिले. त्यामध्ये कृषी निविष्ठा व साहित्यावरील जीएसटी रद्द करण्यासह, विविध मागण्या केल्या आहेत. याबाबत श्री. कुलकर्णी म्हणाले, की सध्या रासायनिक खतांचा अतिवापर होत असल्याने तो कमी करण्यासाठी शेतकरी पुढे येत आहे. अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत. त्यामुळे आगामी काळात सेंद्रिय शेतीला महत्त्व येणार आहे. यासाठी शेतीसंदर्भात शेतकऱ्यांना निविष्ठा, अवजारे असे विविध प्रकारचे साहित्य आवश्यक असते. यासह पशुसंवर्धनासाठीही विविध साहित्य आवश्यक असते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जीएसटी आकारला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होत आहे.
कृषी उत्पादनाच्या वायदे बाजारामुळे शेतकरी आणि ग्राहकांना फायदा होत नाही. यासाठी हे व्यवहार बंद करण्यात यावेत. तसेच सरकार शेतकऱ्यांना मदत व्हावी याकरिता काही पिकांची आधारभूत किंमतीने खरेदी करते. या पिकांची संख्या वाढविण्याची गरज आहे. याशिवाय पंतप्रधान पीकविमा योजनेतील त्रुटी दूर करून नवी योजना सुरू करण्याची गरज आहे. प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ आणि दुग्धजन्य पदार्थांवरील जीएसटी कमी करून तो पाच टक्के करावा. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे याकरिता नॅशनल डेअरी योजनेची अंमलबजावणी करावी, अशा विविध मागण्या निवेदनाव्दारे केल्याचे श्री. कुलकर्णी यांनी सांगितले. या आहेत प्रमुख मागण्या
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.