राज्यात पीकहानी ३५ हजार कोटींवर

पीक नुकसान
पीक नुकसान

पुणे : अतिपावसामुळे राज्यात आत्तापर्यंत फळबागांसह खरीप पिकांची ३५ हजार कोटी रुपयांची हानी झाल्याचा अंदाज आहे. ‘‘राज्यात ओला दुष्काळ पडला असून, दिवसेंदिवस पिकांचे नुकसान वाढते आहे. त्यामुळे यंदा वाटली जाणारी पीक नुकसानभरपाई विक्रमी स्वरूपाची असेल,’’ अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. शेतकऱ्यांनी १४० लाख हेक्टरवर कष्टपूर्वक खरीप पिके घेतली आहेत. मात्र, अतिपावसामुळे प्रत्येक जिल्ह्यातून नुकसानीची माहिती शासनाकडे येऊन आदळत आहे. ‘‘खरिपावर आलेले संकट मोठे आणि ऐतिहासिक आहे. राज्यभर ओल्या दुष्काळाची स्थिती आहे. सरकार स्थापन झालेले नसले तरी कृषी, महसूल, अर्थ तसेच मदत-पुनर्वसन विभाग संयुक्तपणे या संकटाचा आढावा घेत आहे. यंदा शेतीमधील नुकसान ‘न भूतो न भविष्यती' असे दिसते आहे. त्यामुळे विक्रमी स्वरूपाची भरपाई वाटपाची तयारी ठेवावी लागेल, अशी पूर्वकल्पना अर्थ विभागाला देण्यात आली आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्य शासनाला कृषी व महसूल विभागाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार ४ नोव्हेंबरपर्यंत ५४ लाख ८२ हजारांवरील पिके नष्ट झाली आहेत. त्यात ५३ हजार हेक्टर वरील फळबागदेखील आहेत. ‘‘अतिपावसामुळे खरिपाचे झालेले नुकसान अंदाजाच्या पलीकडचे आहेत. आमच्या मते राज्यातील शेतकऱ्यांना त्यामुळे किमान पाच वर्षे तरी सावरता येणार नाही. कारण, आताच नुकसान ३५ हजार कोटीच्या पलीकडे गेल्याचे दिसते आहे. नुकसानीचे अहवाल रोज येत असून ही आकडेवारी दिवसेंदिवस वाढते आहे. सोयाबीन व कापूस या दोन्ही पिकांमुळे राज्याच्या खरिपाला बळ मिळते. मात्र, यंदा या दोन्ही नगदी पिकांची अपरिमित हानी झालेली आहे. त्यामुळे राज्याला आता केंद्राकडून भरीव मदत मिळण्यासाठी प्रस्ताव तयार केला जात आहे. स्वतः मुख्यमंत्री याबाबत केंद्रात जावून पंतप्रधानांकडे साकडे घालण्याची शक्यता आहे,’’ अशी माहिती महसूल विभागाच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.  शेतकऱ्यांनी यंदाच्या खरिपात १३ सप्टेंबर २०१९ च्या अहवालानुसार १३८ लाख ७२ हजार हेक्टरवर पेरा केलेला होता. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, ‘‘शेतकऱ्यांनी ४३ लाख ३८ हजार हेक्टरवर लावलेल्या कपाशीपैकी १९.४६ लाख हेक्टरवरील पीक नष्ट झाले आहे. तसेच, ३९.४९ लाख हेक्टरपैकी १९.५२ लाख हेक्टरवरील सोयाबीन वाया गेला आहे. या दोन्ही पिकांनी शेतकऱ्यांची केलेली हानी हजारो कोटींची आहे.” राज्यात अतिपावसाने कापूस, सोयाबीनप्रमाणेच १.६० लाख हेक्टरवरील धान, दोन लाख हेक्टरवरील ज्वारी आणि सव्वा दोन लाख हेक्टरवरील बाजरी नष्ट झाली आहे. मका उत्पादक शेतकऱ्यांचीदेखील अतोनात हानी झाली असून आतापर्यंत पाच लाख हेक्टरवरील मका मातीमोल झाल्याचे नजरअंदाज आकडेवारीतून स्पष्ट होते आहे. याशिवाय एक लाख हेक्टरवरील तूर आणि सव्वा लाख हेक्टरवरील भुईमूग वाया गेला आहे.  मराठवाड्याला सर्वाधिक फटका सर्वांत जास्त नुकसान मराठवाड्यात झाले असून, तेथे २३ लाख २० हजार हेक्टरवरील पिके मातीमोल झाली आहेत. त्यापाठोपाठ जास्त हानी नाशिक विभागात असून, तेथील १६ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील खरीप वाया गेला आहे. विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांना अतिपावसाने तडाखा दिला असून, धानशेतीचे मोठे नुकसान झाल्याची माहिती हाती येत आहे. आत्तापर्यंत ११.२४ लाख हेक्टरवरील खरीप पिके वाया गेल्याचा अहवाल अमरावती विभागातून आलेला आहे. ठाणे विभागात १.२० लाख हेक्टर, पुणे १.३६ लाख हेक्टर, तर नागपूर विभागातील ९० हजार हेक्टरवरील पिके नष्ट झाली आहेत.  मदतीच्या नियोजनासाठी विचारविनिमय केंद्र शासनाकडे पाठविण्याच्या अंतिम अहवालासाठी माहिती गोळा करण्याचे काम सध्या राज्य शासनाकडून केले जात आहे. त्यासाठी कृषी आणि महसूल विभागाकडून होत असलेल्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली जात असून, केंद्राकडे निश्चित काय भूमिका मांडायची, तसेच शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आर्थिक नियोजन कसे करायचे, याबाबत विचारविनिमय सुरू आहे, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com