परभणी : जिल्ह्यात सोमवार (ता. ६) ते बुधवार (ता. ७) या कालावधीत अतिवृष्टी झाली. त्यामुळे सुमारे १ लाख हेक्टरवरील पिकांचे क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पंचनामे सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतर बाधित क्षेत्र अंतिम करण्यात येईल. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी निधीची मागणी करण्यात येईल, असे महसुल विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील ५२ पैकी परभणी, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा या आठ तालुक्यांतील २६ मंडळात अतिवृष्टी झाली. त्यापैकी ८ मंडळांत १०० मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला. १८ मंडळांत ६५ ते ९९ मिमी पाऊस झाला. उर्वरित मंडळींपैकी १८ मंडळांत ६४ मिमीपर्यंत पाऊस झाला.
गोदावरी, दूधना, पूर्णा, गलाटी, लेंडी आदी नद्यांसह स्थानिक परिसरातील ओढे, नाले यांच्या पुराच्या पाण्यात पिके बुडाली. जमिनी खरडून गेल्या. मुळ्या उघड्या पडल्याने पिके आडवी झाली. अनेक भागात पिकांवर गाळ येऊन बसला.
गोदावरी नदीच्या पुरामुळे पाथरी, मानवत, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा या तालुक्यातील पिकांना फटका बसला. दुधना नदीच्या पुरामुळे सेलू, मानवत,परभणी तालुक्यातील पिके पाण्यात बुडाली. सर्वाधिक नुकसान सोयाबीन, कपाशी, तूर, हळद या पिकांचे झाले. संत्रा, मोसंबी, केळी आदी फळपिके, टोमॅटोसह पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले. गेल्या तीन दिवसांपासून परत पाऊस सुरू झाला. त्यामुळे बाधित क्षेत्राची व्याप्ती वाढत आहे.
पीकविमाधारक शेतकऱ्यांना नुकसानीची पूर्व सूचना देण्यासाठी अडचणींचा डोंगर पार करावा लागत आहे. अनेक ठिकाणी विमा कंपनीचे प्रतिनिधी शेतकऱ्यांना दाद देत नसल्याचे चित्र आहे. याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.