दहा जिल्ह्यांत ‘कृषी तंत्रज्ञान पारायण’

शेतीपिके आणि पशुसंवर्धनाबाबत ऐनवेळी उद्‍भवलेल्या अडचणीवर मात करून वेळीच नुकसान टाळण्यासाठी मार्गदर्शन मिळावे यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यांत ‘कृषी तंत्रज्ञान पारायण’ उपक्रम राबविला जात आहे.
‘Agriculture Technology Parayan’ in ten districts
‘Agriculture Technology Parayan’ in ten districts

नगर ः फळबागा, शेतीपिके आणि पशुसंवर्धनाबाबत ऐनवेळी उद्‍भवलेल्या अडचणीवर मात करून वेळीच नुकसान टाळण्यासाठी मार्गदर्शन मिळावे यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यांत ‘कृषी तंत्रज्ञान पारायण’ उपक्रम राबविला जात आहे. त्यासाठी शास्त्रज्ञांचे पथक नियुक्त केले आहे.

प्रारंभी प्रत्येक जिल्ह्यातील एका गावांची निवड केली जाईल. सांगली जिल्ह्यातील शेटफळ येथून या उपक्रमाला सुरुवात केली असून, यापुढे हा कार्यक्रम कायम सुरू राहील. कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांसह कृषी व पशुसंवर्धन विभागही सहभागी असेल. 

शेतपिके, फळपिके, पशुसंवर्धन याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे आणि वेळीच होणारे नुकसान टाळण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून कृषी तंत्रज्ञान पारायण हा उपक्रम राबवला जात आहे. कार्यक्षेत्रातील नंदूरबार, जळगाव, धुळे, नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यांत हा उपक्रम असेल. कृषी महाविद्यालये, संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्रे, विभागीय विस्तार केंद्रे, जिल्हा विस्तार केंद्रे, कृषी विभाग व पशुसंवर्धन विभागाचा सहभाग असेल. 

प्रारंभी प्रत्येक जिल्ह्यात एक गाव निवडले जाईल. त्या गावांत शास्त्रज्ञांचा चमू भेट देऊन त्या गावातील जमीन, हवामान, गावालगत एखादे मोठे शहर आहे का? कृषी प्रक्रिया उद्योग, याचा अभ्यास करून मातीतील कर्बाचे प्रमाण वाढवणे, पाण्याचा शेतीसाठी काटेकोर वापर, पाणी व्यवस्थापनातून उत्पादन वाढ, सेंद्रिय शेती म्हणजे काय, सेंद्रिय शेती कशी करायची, सेंद्रिय शेतीमुळे होणारे फायदे, शेती उत्पादन खर्च कमी करण्यासाठी उपाय, स्मार्ट शेती, रासायनिक खतांचा समतोल वापर, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा वापर, रिमोट सेंन्सींग तंत्राचा शेतीमधील वापर, सूक्ष्म सिंचनाचे प्रकार, स्थानिक हवामानानुसार शेती सल्ला, फळबाग व्यवस्थापन, शेतीमध्ये आधुनिक तंत्राचा वापर, जनावरांसाठी वर्षभराचे चारा नियोजन, अधिक दुग्ध उत्पादनासाठी जनावरांचे व्यवस्थापन, मुक्त गोठा पद्धतीचे फायदे, देशी गोवंश व्यवस्थापन, मुरघास तंत्रज्ञान, शेळीपालन तंत्रज्ञान, पूर्वमशागतीचे अवजारे, शेतीचे यांत्रिकीकरण, कृषी माल प्रक्रिया, मूल्यवर्धन अशा विविध विषयांवर दिवसभर कृषी शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील व त्यांच्याशी संवाद  साधतील. 

कवी ग. दि. माडगुळकर यांचे जन्मगाव शेटफळे या गावातून या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. तेथे डॉ. अनिल दुरगुडे, डॉ. अशोक वाळुंज, डॉ. देवेंद्र इंडी, डॉ. प्रकाश मोरे या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी प्रत्येक जिल्ह्यातील एक गाव निवडले जाणार असले तरी पुढील काळात या उपक्रमाची व्याप्ती वाढवली जाणार आहे.

राज्यातच नव्हे तर देशात ‘कृषी तंत्रज्ञान पारायण’ हा शेतकरीभिमुख तंत्रज्ञान प्रसाराचा कार्यक्रम प्रथमच आम्ही राबविणार आहोत. यासाठी जिल्हानिहाय शास्त्रज्ञांचा चमू बनवून हा प्रत्येक हंगामातील एक दिवस एक गाव प्रति जिल्हा तंत्रज्ञान प्रसारासाठी घेणार आहे. अशा उपक्रमामुळे शेतकऱ्यांना शेती करण्याचे शास्त्रीय ज्ञान मिळेल व त्यांच्या उत्पन्नात वृद्धी होईल.  - डॉ. पी. जी. पाटील कुलगुरू, महात्मा फुले  कृषी विद्यापीठ, राहुरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com